नुकतेच काश्मीरमधील श्रीनगर येथील मुश्ताक अहमद झारगर याच्या घरावर एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने कारवाई केली आहे. याकडे सगळ्या देशाचे लक्ष वेधले गेले आहे. एकूणच, पाकिस्तानात राहून दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना मिळालेला हा कठोर इशारा आहे. याविषयी विवेचन करणारा हा लेख.
झारगर हा अल उमर मुजाहिद्दीन या संघटनेचा संस्थापक आहे. बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई केली गेली. झारगर हा माजी गृहमंत्री महंमद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिच्या अपहरणाच्या कटात 1989 मध्ये सहभागी होता. तो जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेत सक्रिय होता. तसेच अल-कायदा आणि जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनांशीसुद्धा त्याचे जवळचे संबंध आहेत. त्याला 15 मे 1992 रोजी अटक झालेली होती. पण 31 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअर लाइन्स फ्लाइट-814 च्या प्रकरणात त्याला सोडावे लागले.
इंडियन एअर लाइन्स फ्लाइट अपहरण
हरकत-उल-मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअर लाइन्स फ्लाइट-814 या काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवासी विमानाचे अपहरण केले आणि त्याला कंदहारला नेले होते. प्रवाशांच्या सुटकेसाठी भारत सरकारने दहशतवाद्यांशी वाटाघाटी केल्या. त्यात भारताच्या तुरुंगातील मौलाना मसूद अझहर, अहमद ओमर सईद शेख (याने नंतर अमेरिकेचा पत्रकार डॅनियल पर्लची हत्या केली), मुश्ताक अहमद झारगर या तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती. हा मुश्ताक झारगर आता पाकिस्तानमध्ये असून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवतो.
त्यातील मौलाना मसूद अझहर हा जैश-ए-महंमदचा प्रमुख आहे. याने 300 आत्मघातकी दहशतवादी तयार असल्याचा दावा केला होता. जैश-ए-महंमदने आतापर्यंत केलेले हल्ले- काश्मीरमध्ये भारतीय लष्करी जवानांच्या बरॅकवर हल्ला-2000, जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेवरचा हल्ला-2001, भारताच्या संसदेवरचा हल्ला-2001, पठाणकोट हवाईदलाच्या विमानतळावर हल्ला-2016, मझार-ए-शरीफ या अफगाणिस्तानमधील शहरात भारतीय दूतावासावर हल्ला-2016, उरीवर हल्ला-2016, पुलवामा हल्ला-2019.
विशेष म्हणजे यात “फिदायीन’ म्हणजे आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यांचा समावेश आहे. याचा अर्थ हे हल्ले करताना मरणासाठी कुणी तरी तयार झालेले आहे. या सगळ्या घटकांचा आता पुन्हा नव्याने विचार करणे क्रमप्राप्त आहे. कारण, अफगाणिस्तानमध्ये तालिबानची पुन्हा 2021 मध्ये राजवट आल्यानंतर तालिबान आणि जैश-ए-महंमद यांच्यात पुन्हा घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाल्याचे वृत्त आहे.
जैश-ए-महंमद पुन्हा नव्याने सक्रिय होण्याची भीती आहे. काश्मीरला भारतापासून तोडून पाकिस्तानमध्ये विलीन करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारत सरकारने कलम 370 रद्द करणे हा निर्णय दहशतवादी संघटनांना आवडलेला नाही. त्यामुळे दहशतवादी अनेक मार्गांनी सक्रिय झालेले आहेत. काश्मीरच्या बाबतीत पाकिस्तान मूलतत्त्ववादी लोकांच्या नेहमीच भावना भडकावत ठेवतो.
झारगरच्या घरावर कारवाई मागील हेतू
झारगर जैश-ए-महंमद या संघटनेच्या सदस्यांच्या संपर्कात होता. झारगर हा पाकिस्तानात राहून भारतविरोधी कारवायांना मदत करत आहे. त्यामुळे भारतातील त्याच्या घरावर कारवाई करून प्रतीकात्मक निषेध नोंदवलेला आहे. यातून सगळ्या दहशतवाद्यांना एक संदेश दिला गेला आहे तो म्हणजे, तुमची पाळेमुळे आम्ही नष्ट करू. तुमच्या अस्तित्वाच्या खुणा संपवू. गुन्हा कितीही जुना असो, त्याला माफी नाही हे एनआयएच्या कारवाईत दिसून येते. शक्य झाले तर अशा दहशतवाद्यांना भारतात परत आणून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाऊ शकते.
दहशतवाद विरोधात वास्तववादी धोरण
गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना धडा शिकवण्याचे काम सुरक्षा यंत्रणा करत आहे. विशेषतः “झिरो टॉलरन्स’ बाळगून दहशतवाद्यांचा बंदोबस्त केला जात आहे. गेल्या काही महिन्यांत काश्मीरमधील कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले गेले आहेत. दहशतवाद्यांना ठारसुद्धा केले गेले आहे. हा वास्तववादी धोरणाचाच एक भाग आहे.
भारताने इस्रायलप्रमाणेच वास्तववादी धोरणाची अंमलबजावणी करणे सुरू केली आहे. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही हा दृढ संदेश यातून दिलेला आहे. ज्या दहशतवाद्यांना न्यायालयात उभे करता येऊ शकत नाही, त्यांना इस्रायली यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचून ठार करतात. भारतानेसुद्धा वास्तववादी धोरणाचा स्वीकार करून भारतीय नागरिकांची सुरक्षा हे प्राधान्य असल्याचे दाखवून दिलेले आहे. दहशतवादी कृत्य करायला कुणी सहजासहजी धजावणार नाही अशी जरब बसणे गरजेचे आहे. विशेषतः काश्मीर खोऱ्यात चलणाऱ्या दहशतवादी कारवायांना यातून आळा घातला जाणार आहे.
अनेक दहशतवादी पाकिस्तानात आजही सुरक्षित आहेत. पाकिस्तानात आश्रय घेणाऱ्या दहशतवाद्यांपैकी हाफिज सईद हा एक आहे. लष्कर-ए-तोयबाच्या स्थापनेत त्याचा सहभाग आहे. 2008 च्या मुंबईवरील हल्ल्याचा तो सूत्रधार आहे. त्याला भारतात आणण्याचे अनेक प्रयत्न केले जात आहेत. भारतातील दहशतवादाला असे गुन्हेगार पाकिस्तानात राहून सगळी मदत पुरवतात. दहशतवादाचा विचार करताना इस्रायलच्या धोरणाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. इस्रायलने अबू जिहाद या दहशतवाद्यांच्या म्होरक्याला त्याच्या घरात शिरून ठार केले होते. त्याचे इस्रायलच्या विरोधी गुन्हे भरपूर प्रमाणात वाढलेले होते.
ट्यूनिसच्या बाहेर एका आलिशान घरात अबु जिहाद राहात होता. इस्रायलच्या मोसाद एजंटांनी काही महिन्यांच्या परिश्रमानंतर सर्व रस्ते, घराची प्रवेशद्वारे, खिडक्या, दारे, अबु जिहादच्या पत्नी आणि मुलांचा दिनक्रम, खेळण्याच्या जागा या घरात म्हणजेच व्हिलात येणाऱ्या गाड्या, शेजारी सर्वच माहिती मिळवली. त्यानंतर त्याला ठार मारण्याची योजना बनवून अमलात आणली होती. इस्रायलने दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी कोणताही मार्ग स्वीकारण्याची तयारी ठेवली. अली हसन सालमेहला रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडीच्या स्फोटाने ठार केले तर वादी हद्दाद याला चॉकलेटमध्ये विष देऊन ठार केले होते. अर्थात, इस्रायलचे धोरण वेगळे आहे.
एकूणच भारताचे दहशतवाद विरोधी धोरण अधिक तीव्र होणे ही काळाची गरज आहे. देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादी संघटनांना जरब बसवणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा कारवाया करणे अपरिहार्य आहे.