नगर – राष्ट्रीय महामार्ग 222 च्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी 2018 मध्ये संपादित करण्यात आल्या होत्या. सदर जमिनी संपादित करताना कुठलाही विचार न करता त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. यामध्ये काही क्षेत्र बागायती, काहींच्या फळबागा अशा अनेक जमिनी होत्या.
या सर्व जमिनी सरसकट जिरायती दाखविण्यात आल्या. त्यामुळे अनेक त्रुटी आहेत. सदर त्रुटी शासनास वेळोवेळी निवेदनाद्वारे दाखवून देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही.त्यामुळेच या कामी झालेल्या अंतिम निवाड्यातील त्रुटींचे निरसन होणे गरजेचे आहे. या निरसनासंदर्भातील निवेदन केडगाव, निंबळक, नेप्ती, अरणगाव व सोनेवाडी येथील बाधित शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांना देण्यात आले.
खा. विखे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर या कामी लक्ष घालण्याचे मान्य केले असून, कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही.
बाधित शेतकरी व शासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लावू, असे ते म्हणाले. यावेळी सर्वश्री. नीलेश गुंजाळ, आबूज मेजर, पोपट कराळे, अशोक कोतकर, माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर, गणेश गुंड, विजय कोतकर, संतोष कोतकर, विशाल राहिंज, गणेश कराळे, नगरसेवक सुनील कोतकर, जालिंदर कोतकर, युवराज कोतकर, विशाल कराळे, गणेश नन्नवरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने केलेल्या चुका शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. निवाडा झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची परिपत्रके, मोजणी शीट, तसेच केलेले मुल्यांकन याच्या प्रती शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नाहीत. उलट माहिती अधिकाराचे अर्ज करायला लावणे, नाहक त्रास देणे अशा प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे.