भोपाळ : नॅशनल हेराल्डच्या मुद्द्यावर काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेऊन माध्यमे आणि जनतेसमोर आपले विचार मांडत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार कुमारी शैलजा यांनी सोमवारी भोपाळमध्ये पत्रकार परिषद घेतली. नॅशनल हेराल्ड प्रकरण हे देशासमोरील ज्वलंत मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि देशाची दिशाभूल करण्यासाठी भाजपचे एक षड्यंत्र आहे, हा निव्वळ राजकीय सूडाचा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध ईडीने दाखल केलेले आरोपपत्र हे बेरोजगारी, घसरणारा जीडीपी आणि सामाजिक अशांतता यापासून लक्ष विचलित करण्यासाठी अस्तित्वात नसलेला खटला निर्माण करून जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि गोंधळात टाकण्यासाठी बनवलेले खोटे प्रकरण आहे. आर्थिक संकट, लोकांच्या समस्या आणि अमेरिका, चीन, बांगलादेश या परराष्ट्र धोरणातील आव्हानांवरून लक्ष विचलित करण्यासाठी कॉंग्रेसला जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. हे कायद्याआडून सूडबुद्धी करण्याव्यतिरिक्त दुसरे काहीही नाही.
देशात पहिल्यांदाच, पैसे किंवा मालमत्तेचे हस्तांतरण न करता मनी लाँड्रिंगचा खटला दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातून मिळणारे उत्पन्न कुठे आहे असा सवाल शैलजा यांनी केला. शैलजा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कायद्याचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लाँडरिंगचा विषयच कुठे असतो किंवा गुन्हा कुठे असतो? जर एखाद्या कंपनीला तिचे कर्ज फेडायचे असेल तर ती एक नवीन कंपनी स्थापन करते आणि ते कर्ज नवीन कंपनीला हस्तांतरित करते. कंपनी कायद्यानुसार हे कायदेशीर आहे. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लाँडरिंग कुठे असते? जर कोणताही गुन्हा झालाच असेल तर तो दोन मास्टरमाइंडने केला आहे.
ईडीने एनडीएच्या कोणत्याही सहयोगी किंवा भाजप नेत्याला का स्पर्श केला नाही याचे उत्तर द्यावे. सरकारने ईडीला आपला निवडणूक विभाग बनवले आहे आणि सूडबुद्धीने त्याचा वारंवार गैरवापर करत आहे. ईडीच्या प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त १ टक्के आहे. शिवाय, ईडीने नोंदवलेल्या राजकीय प्रकरणांपैकी ९८ टक्के खटले सत्ताधारी पक्षाच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आहेत. हा खटला न्यायालयात पूर्णपणे अपयशी ठरेल, असा दावा कुमारी शैलजा यांनी केला.