-अमित डोंगरे
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी व गेल्यानंतर भारतीय संघातील जवळपास 10 खेळाडू दुखापतीने ग्रासले गेले. त्यांच्या जागी संघातील नवोदितांना संधी दिली गेली, ही चांगली बाब असली तरीही राष्ट्रीय क्रिकेट अकादमी व भारतीय संघाची निवड समिती सांगत असलेला सेकंड बेंच नक्की आहे कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये आज बीसीसीआय गर्भश्रीमंत आहे यात शंका नाही. मग प्रश्न हा निर्माण होतो की जर मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा जायबंदी झाले होते, तर नव्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियात का नेले नाही. त्यांचा खर्च करण्याइतका अफाट पैसा बीसीसीआयकडे आहे. माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत भारताचा सेकंड बेंच तयार होत असल्याचे अनेकदा बीसीसीआयने तसेच राष्ट्रीय निवड समितीने सांगितले आहे. पण मग हा सेकंड बेंच नक्की आहे का, आणि असेल तर तो कुठे आहे, असेच विचारावेसे वाटते.
ऑस्ट्रेलियातील मालिकेला सुरुवात झाली आणि महंमद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, हनमा विहारी, रवीचंद्रन अश्विन व जसप्रीत बुमराह यांना दुखापत झाली. यामुळे या सर्वांना मालिकेतून बाहेर पडावे लागले. त्यातून सावरत भारतीय संघाच्या थिंकटॅंकने नवोदीत नवदीप सैनी, टी. नटराजन, महंमद सिराज व वॉशिंग्टन सुंदर यांना पदार्पणाची संधी दिली. त्यापैकी सिराज व सैनी यांनी सिडनी कसोटीत पदार्पण केले तर नटराजन व सुंदर यांनी ब्रिस्बेन कसोटीद्वारे पदार्पण केले.
एकप्रकारे चांगले झाले की या खेळाडूंना संधी दिली गेली. कारण जर प्रमुख खेळाडू फिट असते तर या खेळाडूंना केवळ पर्यटक म्हणूनच सांभाळावे लागले असते. मात्र, जेव्हा मयंक आग्रवाल व राहुल जायबंदी ठरले तेव्हा भारताच्या सेकंड बेंचमध्ये केवळ पृथ्वी शॉ हा एकच खेळाडू ऑस्ट्रेलियात होता. आयपीएल गाजवणारा इशान किशन, संजू सॅमसन, दीपक चहर किंवा त्यावेळी स्पर्धेत हिट ठरलेले खेळाडू कुठे आहेत.
आयसीसीच्या नियमांनुसार किंवा ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या नियमांनुसार तेथे दाखल झालेल्या खेळाडूंनी काही दिवस विलगीकरणात राहावे लागले असते. पण रोहित शर्मा का राहिला नाही. तसे अन्य खेळाडूंबाबतही करता आले असते. जेव्हा पहिल्या कसोटीवेळीच लक्षात आले होते की प्रमुख खेळाडूंना दुखापत झाली आहे. तेव्हाच या नवोदीत किंवा सो-कॉल्ड सेकंड बेंचला तेथे पाठवता आले असते.
रवींद्र जडेजा व अश्विन जायबंदी झाल्यावर सुंदर किंवा कुलदीप यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळणार हे उघड होते. मग त्यात फलंदाजीच्या दर्जावरुन सुंदरने संघात स्थान मिळवले. सलामीला पृथ्वी शॉ, आग्रवालने काय दीवे लावले हे आपण पाहिले. पण त्याचवेळी सिडनी कसोटीत राहुलला का खेळवले गेले नाही. बर एकदिवसीय मालिका तसेच टी-20 मालिका संपल्यावरही अनेक खेळाडू कसोटी मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.
या दोन मालिका संपल्यावर कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच नव्या खेळाडूंना सेकंड बेंच म्हणून बोलावता आले नसते का. आता चौथ्या कसोटीत संधी मिळालेल्या नवदीप सैनीलाही दुखापत झाली आहे. आता भारतीय संघाला चार वेगवान गोलंदाज असूनही उणीव जाणवणार आहे. ए
कीकडे करोडो रुपये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीवर तसेच निवड समितीच्या सदस्यांच्या मानधनावर आणि बैठकांवर खर्च केले जातात. मग संघाची परदेशात अशी स्थिती असताना नवोदित खेळाडूंना तेथे का बोलावले जात नाही. 1992 साली झालेल्या मालिकेत प्रमुख फलंदाज जायबंदी झाल्यावर दिलीप वेंगसकर यांना नव्हते का बोलावले गेले. तीच पद्धत यंदाही वापरता आली असती. अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड व निवड समिती याचा विचार भविष्यातील मालिकांबाबत करेल का असा प्रश्न आहे.