नवी दिल्ली- केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 26 ऑगस्ट या दिवशी 9 महिने पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त संबंधित दिवशी राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय शेतकरी आंदोलकांनी घेतला आहे.
शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रीय अधिवेशनाविषयीची माहिती दिली. त्या अधिवेशनाचे ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल.
कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी आंदोलक ठाम आहेत. कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मात्र, मोदी सरकार ती मागणी मान्य करण्यास तयार नाही.
आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, दोन्ही बाजू आपापल्या भूमिकांवर कायम राहिल्याने ती कोंडी फुटू शकली नाही.
दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनात अनेक राज्यांमधील शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.