कराईकुडी (तमिळनाडू) – विजेतेपद मिळविण्यापेक्षाही ते टिकविणे हे जास्त आव्हानात्मक असते. मात्र, सातत्यपूर्ण कामगिरी करीत भक्ती कुलकर्णी हिने महिलांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद राखले.
या स्पर्धेतील अकरा फेऱ्यांमध्ये अपराजित्व टिकवित तिने निर्विवाद वर्चस्व गाजविले. तिला 10 गुण मिळाले. शेवटच्या फेरीत तिला विजेतेपदासाठी केवळ अर्ध्या गुणाची गरज होती. या फेरीत तिने प्रत्युषा बोडा हिच्याविरुद्ध बरोबरी केली. दिल्लीची खेळाडू वंतिका अग्रवालने उपविजेतेपद पटकाविले. वंतिका व महाराष्ट्राची युवा खेळाडू दिव्या देशमुख यांनी प्रत्येकी 8.5 गुणांची कमाई केली.
मात्र, प्रगत गुणांच्या आधारे वंतिकाला दुसरे तर दिव्यास तिसरे स्थान देण्यात आले. शेवटच्या फेरीत वंतिकाने महाराष्ट्राच्या मृदुल देहाणकर हिला बरोबरीत रोखले. देशमुखने 11 व्या फेरीत पी.व्ही.नंदिधा या तमिळनाडूच्या खेळाडूवर शानदार विजय मिळविला. प्रत्युषा व मृदुल यांना अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळाला.