डॉ. अली यांचा 12 नोव्हेंबर जन्मदिवस :अतिक्रमण, कचरा आणि प्रदूषणामुळे जैवविविधता धोक्यात
पुणे – देशाला भारतीय पक्षीशास्राची ओळख करून देणारे डॉ. सालीम अली यांच्या स्मृती जपणारा आणि असंख्य पक्ष्यांचे निवासस्थान असलेले पुण्यातील येरवडा येथील अभयारण्य प्रशासकीय दुर्लक्षामुळे आज अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. अतिक्रमण, कचरा आणि जलस्रोतांचे प्रदूषणाने वेढलेल्या या परिसरातील जैवविविधता धोक्यात येत असल्याची चिंता पर्यावरण अभ्यासकांना सतावत आहे.
“बर्डमॅन ऑफ इंडिया’ अशी ओळख असणारे आणि भारतीय पक्षीशास्राचे जनक असलेले डॉ. सालीम अली यांचा 12 नोव्हेंबर हा जन्मदिवस. हा दिवस देशभरात राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा होतो. ज्या काळात भारतात पक्षीशास्त्र (ऑर्निथोलॉजी) हा विषय अस्तित्वातच नव्हता. अशा काळात त्यांनी पक्षीनिरीक्षण करत, आपल्याकडील पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या. यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन पक्षीशास्त्राचं प्रशिक्षण घेतलं व काहीकाळ इंग्लंडमध्ये काम केलं.
डॉ. सालीम अली यांनी देशाच्या वायव्य सरहद्दीपासून ते केरळच्या जंगलांपर्यंत तसेच कच्छच्या दलदलीपासून पूर्वेकडे सिक्कीम व अरुणाचलपर्यंत जाऊन त्यांनी पक्ष्यांच्या नोंदी केल्या.
पक्ष्यांचे वर्तन, त्याच्यांत हवामानानुसार होणारे बदल, स्थलांतराच्या सवयी, विणीचे हंगाम यावर मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली. त्यांनी एकूणच पक्षीशास्त्राला वेगळी दिशा दिली.
तिढा आजही कायम…
पुण्यातील पर्यावरणशास्रज्ञ प्रकाश गोळे यांच्या प्रयत्नातून येरवडा येथील पक्षी अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. डॉ. अली आणि पर्यावरण अभ्यासक डॉ. एरिक भरूचा यांनी 1970 साली या ठिकाणाला भेट देली होती. ही जागा म्हणजे तब्बल 100 पक्षी प्रजाती आणि 30 प्रकारच्या फुलपाखरांचे निवासस्थान असल्याची नोंद अभ्यासकांकडे उपलब्ध आहे. मात्र, जैवविविधतेचा संपन्न वारसा लाभलेला हा परिसर आज अतिक्रमण, कचरा आणि जलस्रोतांचे प्रदूषण अशा विविध समस्यांनी ग्रासलेला असून अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे.
वनविभाग, महसूल विभाग, महापालिका यांच्यामधील मालकीच्या वादामुळे हा परिसर सातत्याने दुर्लक्षित राहिला आहे. हा परिसर वाचविण्यासाठी अनेक प्रकारे चळवळ करण्यात आली. मात्र, डॉ. सालीम अली पक्षी अभयरण्याचा तिढा आजही कायम आहे.