पुणे – राज्यातील सर्व महाविद्यालयांच्या कामकाजाची सुरुवात आता राष्ट्रगीताने होणार आहे. प्राथमिक शाळेपासून वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत राष्ट्रभावना जागृत व्हाव्यात, या उद्देशाने महाविद्यालयांमध्येही आता राष्ट्रगीताने दिवसाच्या शैक्षणिक कामकाजाला सुरुवात होणार आहे. या निर्णयाची घोषणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिवशी (दि.19 फेब्रुवारी) करण्यात येणार आहे, अशी माहिती माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
“संवाद, पुणे’तर्फे शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत सामंत यांच्याशी शहरातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, शैक्षणिक संस्थाचे प्रमुख आणि प्राचार्य यांच्या संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानपरिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, सूर्यदत्ताचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांच्यासह अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
सामंत म्हणाले…
शैक्षणिक संस्था प्रमुखांच्या बैठकीत अनेकांनी विविध सूचना मांडल्या आहेत.
प्रामुख्याने इंजिनिअरींग, डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसदर्भात पाच जणांची उच्चस्तरीय समिती स्थापन करू
ओपन युनिव्हर्सिटींच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी बैठक घेणार
सीईटीचा अर्ज भरताना फॉर्म चुकल्यानंतर विद्यार्थ्यांना शुल्क परत करू.
महाविद्यालयाचे आवार तंबाखूमुक्त व स्वच्छतापूर्ण असावेत यासाठीही योग्य ते निर्णय घेणार
महाविद्यालयांच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने करावी. याबाबतचे परिपत्रक प्रत्येक महाविद्यालयांना पाठवण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, तब्बल 15 लाख विद्यार्थी दर दिवशी राष्ट्रगीत म्हणणार आहेत, असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. या उपक्रमास खाजगी विद्यापीठे, महाविद्यालयांनी सहकार्य करावे.
– उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री.