नवी दिल्ली: जगासह देशात गोंधळ उडवलेल्या पेगॅसस प्रकरणावरून काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी सरकारला घेरण्यासाठी प्लॅन तयार केला असल्याचे दिसत आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात पेगॅसस प्रकरणी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक सुरु आहे. या बैठकीला शिवसेना नेते संजय राऊत ही उपस्थित होते.
पेगॅसस प्रकरणावरुन आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, ‘संसदेत पेगासस प्रकरणावर चर्चा व्हावी आणि या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे. पण देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सरकारकडे वेळ नसेल, तर या मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही’, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने तयार केलेले पेगॅसस हे स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या डेटाबेसमधून उघडकीस आलेल्या माहितीत ५० हजार मोबाइल क्रमांकाचा समावेश आहे. त्यातील ३०० मोबाइल क्रमांक भारतीय आहेत. हे मोबाइल क्रमांक वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, विधिज्ञ, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते यांचे असल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.