नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील भाजपची विवादित लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर हिच्या आणखी एका वक्तव्याने भारतीय जनता पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरने आज एका माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना, “नथुराम गोडसे ‘देशभक्त’ होते, ते ‘देशभक्त’ आहेत आणि ते ‘देशभक्तच’ राहतील. जे लोक नथुराम गोडसेंना आतंकवादी म्हणतात त्यांनी आत्मचिंतन करायला हवं, अशा लोकांना या निवडणुकीत जनतेकडून योग्य उत्तर देण्यात येईल”असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
तत्पूर्वी, चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी अर्वाकुरची येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण करताना प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी, “नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता” असं वक्तव्य केल्याने मोठी खळबळ माजली होती.
कमल हसन याच्या वक्तव्यानंतर देशभरातील भाजप नेत्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली असून भाजप नेत्यांकडून त्याच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात येत आहे. दरम्यान याच पार्शवभूमीवर आता भाजपची विवादित लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर हिने थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याला देशभक्त ठरवल्याने नवा वाद उफाळून येण्याची चिन्हं आहेत.
.