ऍड. बाबुराव कानडे
अनाथाचा नाथ बापू पै (जन्म- 25 सप्टेंबर 1922, वेंगुर्ला, मृत्यू- 18 जानेवारी 1971, बेळगाव) यांना “नाथ हा माझा’ हे शीर्षक खास शोभून दिसतं. त्यांनी लंडनला जाऊन बॅरिस्टर पदवी घेतली. त्या काळात लंडनला जाऊन बॅरिस्टर होऊन, राजकारण करणे एक पद्धतच होती. बॅरिस्टर चालत नव्हती म्हणून नव्हे तर उच्चशिक्षित मंडळी स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने तयार असल्याचे ते द्योतक होते.
बॅरिस्टर नाथ बापू लंडनमध्ये शिकत होते त्या वेळेला ते इंटरनॅशनल स्टुडन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष होते. प्रजासमाजवादी पक्षात बॅरिस्टर नाथ पै हे मोठे पुढारी झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात बॅरिस्टर नाथ पै यांनी उडी घेऊन जनजागृती केली.
महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्र स्वाभिमान त्यांनी कोकणपट्टीत पुनर्प्रस्थापित केला. 1957 च्या निवडणुकीत बॅरिस्टर नाथ पै राजापूरमधून खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले. त्यांनी लोकसभेतील पहिलं भाषण अतिशय तेजस्वी, परखड असे केले. ते भाषण गाजलं.
पुण्यातील वसंत व्याख्यानमाला ही महाराष्ट्रातील प्रचंड मोठी संस्था महादेव गोविंद रानडे यांनी निर्माण केली होती. या वसंत व्याख्यानमालेत बॅरिस्टर नाथ पै यांचे व्याख्यान न झाल्यास नवलच. मला बॅरिस्टर नाथ बापू यांची पहिली भेट येथील भाषणातूनच झाली. त्यांचा “सहन’ हा शब्द,
एखाद्या पितळी पातेल्यावर चिमट्याने दाणकन मारावा व त्यातून जो आवाज निर्माण होईल तसा ते म्हणायचे. “गहन’ देखील तसाच म्हणायचे. त्यांचे भाषण ऐकण्याकरता तरुणांमध्ये कमालीची उत्सुकता होती. त्यानंतर बॅरिस्टर नाथ पै यांची माझी तशी भेट झाली नाही.
मात्र समाजवादी पक्ष, प्रजासमाजवादी पक्षाचे शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये अखिल भारतीय परिषद पुणे येथे संयुक्त महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर परिषद भरली होती. एस. एम. जोशी हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे जनरल सेक्रेटरी होते. त्यावेळेला बॅरिस्टर नाथ पै यांना एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करताना पाहिले आणि मला आश्चर्य वाटले.
तसेच शनिवारवाड्याच्या सभेपुढे वक्ते म्हणून असतानादेखील ते स्वयंसेवकासारखे काम करत होते. या दोन गोष्टींमुळे बॅरिस्टर नाथ बापू पै यांची प्रतिमा माझ्या मनात उत्तम प्रकारे कोरली गेली. आदर्श स्वयंसेवक पुढारी आणि विधायक वक्ता असाच असावा.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात, गोव्याचा लढ्याच्या दगदगीत अगोदरच अंगकांती अतिशय किरकोळ असतानासुद्धा बॅरिस्टर नाथ पै हे सारखी धावपळ करीत असत. ते मलमलचा पांढरा गुरू कुर्ता वापरत, खादीची पांढरी किंवा निराळी निळ्या रंगाची पॅंट वापरत असत.
हा त्यांचा साधा पोशाख होता. गौर मूर्ती आणि थोडेसे कुरळे केस अशा प्रकारची आकृती डोळ्यासमोर येते. आजपासून बॅरिस्टर नाथ पै यांची जन्मशताब्दी सुरू होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात मन्वंतर घडावे.