नाशिक – नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी येथील मतिमंद मुलांच्या आश्रम शाळेतील काही मुलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यातून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. अन्य चार मतिमंद विद्यार्थी अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही विषबाधा नेमकी कशातून झाली हे अजून समजलेले नाही. अन्न किंवा पाण्यातून त्यांना ही बाधा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे मतिमंदांचे निवासी विद्यालय आहे. काल रात्रीच्या जेवणात त्यांना खिचडी देण्यात आली होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला तेथील विद्यार्थ्यांना मळमळू लागले आणि त्यातून काही जणांना उलट्याही झाल्या. त्रास झालेल्या विद्यार्थ्यांना इगतपुरीच्या रूग्णालयात नेण्यात आले. तेथे दोन मुलांचा मृत्यू झाला. या प्रकाराची चौकशी केली जात आहे.