नाशिक, की दिल्ली? यावरून सुरू आहे चर्चा
पुणे – यंदाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी सरहद संस्थेने दिल्ली येथे संमेलन घेण्याबाबत निमंत्रण दिले होते. मात्र, शुक्रवारी महामंडळाने नाशिक येथे संमेलन घेणार असल्याचे जाहीर केले. यादरम्यान, “सरहद’ने संमेलनाची संधी हुकवल्याचे महामंडळाने म्हटले असून, याबाबत “सरहद’ संस्थेने तीव्र नाराजी व्यक्त करत आरोप फेटाळला आहे.
यंदाच्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत दिल्लीकरांची विशेष साहित्य संमेलनाची संधी सरहदने हुकवल्याचे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील पत्रकाद्वारे म्हणाले. मात्र यामध्ये तथ्य नसून “संधी हुकवल्याचा’ आरोप सरहद संस्थेने फेटाळला आहे.
दिल्लीच्या मराठी संस्थांनी एकदा त्यांना दिलेले आणि त्यांनी स्वत:हून नाकारलेले साहित्य संमेलन पुन्हा दिल्लीला व्हावे, अशी मागणी गेले काही दिवस सरहद संस्थेने दिल्लीसाठी दिलेल्या निमंत्रणाचा आधार घेऊन दिल्लीतील मराठी नागरिक करत आहेत. त्यांच्या मागणीचा आदर करून दिल्लीकरांसाठी त्यांची तयारी असली तर, विशेष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देण्याचा विचार महामंडळ करेल, असे सरहदचे निमंत्रक संजय नहार यांना सुचविले होते. यासह विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी देखील तसा प्रस्ताव दिला होता.
पण, नहार यांनी महामंडळाचा हा प्रस्ताव नाकारला आणि दिल्लीकरांची विशेष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची संधी 94 वे संमेलन नाशिकमध्ये घेण्याच्या महामंडळाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. नाशिक किंवा दिल्ली हा कधीही वाद नव्हता. सरहद संस्थेने दिल्लीमधील विशेष संमेलन घेण्याची संधी चुकविली, असा आरोप ठाले पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये केला आहे.
दिल्लीमध्ये विशेष संमेलन घेण्याचा किंवा पुढील वर्षी सरहद संस्थेच्या पुढाकाराने दिल्लीत घेण्याचा प्रस्ताव ठाले पाटील आणि म्हैसाळकर यांनी आम्हाला दिला होता. मात्र, आम्ही ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जासह महाराष्ट्र एक आहे, महाराष्ट्र नेहमी देशाचा विचार करतो. हा संदेश जाण्याच्या अनुषंगाने आणि महाराष्ट्राच्या स्थापनेला 61 वर्षे पूर्ण होत असताना देशाची राजधानी असलेली दिल्ली यंदाच्या संमेलनासाठी योग्य स्थान आहे, अशी आमची आणि दिल्लीतील नागरिकांची भावना होती, असे संस्थेच्या वतीने संजय नहार यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दिल्लीत एकदाही संमेलन झाले नाही. देशाच्या वर्तमान स्थितीत दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणे आणि त्या माध्यमातून देशाबाबत मराठी माणसाच्या भावना प्रकट करण्याची संधी म्हणून आम्ही या संमेलनाचा प्रस्ता दिला होता. मराठी साहित्य संमेलन हे “अखिल भारतीय’ असते. ते दिल्लीत झाले असते, तर खऱ्या अर्थाने “अखिल भारतीय’ ठरले असते.
विशेष संमेलन किंवा पुढील वर्षीचे संमेलन याबाबत ठाले पाटील आणि म्हैसाळकर यांची भूमिका आणि कृती यात विरोधाभास असल्याने आणि तोपर्यंत स्थळ निवड न झाल्याने आम्ही दिल्लीचा आग्रह कायम ठेवला होता. सरहद संस्थेचे नाव नाही आले तरी चालेल. पण कुसुमाग्रजांशी संबंधित संस्थेने दिल्लीत मराठी संमेलन घेतले तरी चालेल असाही प्रस्ताव आम्ही दिला होता. स्थळ निवड नाशिकचीच करायची हे त्यांनी आधीच ठरवल्याचेही दिसून येते. प्रत्यक्षात तोंडी बोलणी झाल्यानुसार याबाबत कोणताही प्रस्ताव महामंडळाने कधीही दिला असल्याचे सरहदच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.