नाशिक – सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाच घेण्याचे प्रकार वाढत आहेत. राज्यात हा चिंतेचा विषय बनला आहे. काही अधिकारी हे कोणतेही काम करण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतात. यातून ते त्यांच्या मूळ वेतनापेक्षा मोठी रक्कम कमावतात. जेव्हा त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई होते त्यावेळी त्यांनी कमवलेली माया बाहेर पडते. दरम्यान, नाशिक मनपातील शिक्षणाधिकारी सुनिता सुभाष धनगर (वय 57) यांना 50 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. अटकेनंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता मोठी रोख रक्कम आणि सोने सापडले आहे.
काय आहे प्रकरण ?
लाचखोर सुनिता सुभाष धनगर या नाशिक महानगरपालिकेत शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार हे एका शैक्षणिक संस्थेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना काही कारणावरून सदर संस्थेने बडतर्फ केले होते. त्यानंतर शैक्षणिक न्यायाधिकरण नाशिक येथे दाद मागितल्याने त्यांच्यावरील बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली होती. तरी देखील सदरील संस्था तक्रारदार यांना सेवेत दाखल करुन घेत नव्हती.
त्यानंतर त्यांनी मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे सदरील संस्थेवर कारवाई करण्यासाठी अर्ज केला. त्यासाठी सुनीता धनगर यांनी याबाबत पत्र देण्यासाठी 50 हजार रुपये मागितले. मात्र, तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने पडताळणी करुन सापळा रचला. सुनीता धनगर यांना तक्रारदार यांच्याकडून 50 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर मनपा कर्मचारी नितीन जोशी यांनी सदर पत्र बनवण्याच्या मोबदल्यात 5 हजार रुपये लाच स्वीकारली.
कारवाईनंतर पथकाने सुनीता यांच्या घराची झडती घेतली. यावेळी त्यांच्या घरात 85 लाख रुपये रोख रक्कम आणि 23 तोळे सोने सापडले आहे. तसेच त्यांच्या नावावर 2 फ्लॅट आणि एक प्लॉट देखील असल्याची माहिती समोर आलेली आहे. धनगर ज्या फ्लॅटमध्ये रहावयास आहेत तो फ्लॅट थ्री बीएचके असून त्याची किंमत सुमारे दीड कोटी एवढी आहे. त्यांचा अडगाव येथे प्लॉट असून एक फ्लॅट टिळकवाडी तर दुसरा फ्लॅट उंटवाडी येथे आहे. याबाबत नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी माहिती दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक गायत्री जाधव पोलीस अंमलदार एकनाथ बाविस्कर,प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांच्या पथकाने केली.