मुंबई – नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची कामे सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तात्काळ पूर्ण करावीत, टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे विहित वेळेत पूर्ण केली नाही तर संबधित यंत्रणेवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. राष्ट्रीय महामार्ग वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोलप्लाझा या रस्त्याची दुरावस्था, वाहतूक कोंडीच्या उपाययोजनांबाबत झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी हे निर्देश दिले.
नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून निकृष्ट रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. टोल नाक्यांची कामे करताना सर्व रस्ते वाहतूक तसेच कार्यान्वयीन यंत्रणांनी आपल्या कामांत समन्वय ठेवावा.
पावसामुळेदेखील या रस्त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल प्लाझा या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची स्वत: पाहणी करावी व कामांना तात्काळ गती द्यावी, असे भुजबळ यांनी सांगितले.