नाशिक – शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि इतर समविचारी संघटना एकत्र येऊन हा लॉन्ग मार्च काढला आहे. हा लॉन्ग मार्च दिंडोरीमधून निघाला असून 21 मार्चला किसान सभा आणि माकपच्या नेतृत्वाखाली शेतकरी मुंबईत पोहोचणार आहेत.
नाशिकच्या दिंडोरी येथून या लॉंन्ग मार्चला सुरवात झाली असून सायंकाळी नाशिक शहरात दाखल झाला आहे. शेतकऱ्यांचा आजचा मुक्काम नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ असणार आहे. तब्बल 8 दिवसांत पायी प्रवास करत शेतकरी मुंबईत पोहोचणार आहेत. 21 मार्चला जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी मुंबईत पोहोचतील. शेतमालाचे पडलेले भाव आणि हक्काच्या वन जमिनीसाठी आदिवासी शेतकऱ्यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे.
माजी आमदार जेपी गावित म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हैराण आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला, कांद्याचे भाव गेले, द्राक्ष बाग देखील खराब झाल्या आहेत. कापूस आणि सोयाबीनचे पण भाव देखील कोलमडले आहेत. शेतकरी वर्ग वैतागलेला असून सरकार याबाबत दखल घेत नाही.
सरकारी कार्यालयात आता कंत्राटी भरती केली जात आहे. त्यामुळे सरकारची भूमिका हळूहळू बदलायला लागलेली आहे. म्हणून आमचा मोर्चा काढला असून महाराष्ट्राच्या जनतेला जागृत करण्यासाठी हा मोर्चा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मोर्चा असल्याचे गावित म्हणाले.
दरम्यान, कांद्याला 600 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या. कांदा निर्यातीच्या सर्व शक्यता पडताळून पाहून कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करा. किमान 2 हजार रुपये दराने कांद्याची नाफेड मार्फत मोठ्या प्रमाणात खरेदी करा, यासह विविध मागण्या करण्यात येत आहे.