आळंदी – नामा म्हणे प्रदक्षिणा | त्याच्या पुण्या नाही गणना ||
हिमालय पर्वत ही भारताला लाभलेली अनमोल संपत्ती आहे. तेथूनच अनेक नद्यांचा उगम होतो. त्यात नर्मदा परिक्रमेला विशेष महत्व आहे. नर्मदा परिक्रमा केल्याने अगणित पुण्यप्राप्ती होते, असे प्रतिपादन शांतीब्रम्ह मारोती महाराज कुऱ्हेकर (बाबा) यांनी केले. नर्मदा परिक्रमा – मार्गदर्शिका या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
कुऱ्हेकर बाबा म्हणाले, नर्मदा परिक्रमा करत असताना साधकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ह.भ.प. वसंत म. शास्त्री यांनी नर्मदा परिक्रमा केली आणि त्यांना ज्या अडचणी आल्या त्या इतर कोणत्या व्यक्तिला येऊ नयेत यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या प्रत्येकाला या पुस्तकातून मार्गदर्शन मिळेल. तसेच भाविकांनी इंद्रायणीचीही परिक्रमा करावी, असेही कुऱ्हेकर बाबा म्हणाले.
ज्ञानेश्वरी मंदिराचे मठाधिपती विष्णू महाराज केंद्रे म्हणाले, जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाय । तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जाय चुकों नको |
नर्मदा परिक्रमा ही एक खडतर तपश्चर्याच आहे. जोपर्यंत आपले हात पाय चालतात, सर्व काही ठीक आहे तोपर्यंत प्रत्येकाने तिर्थयात्रा कराव्यात, असे केंद्रे महाराज म्हणाले.
नर्मदा परिक्रमा – मार्गदर्शिका या पुस्तकाचे प्रकाशन शांतीब्रम्ह मारोती महाराज कुऱ्हेकर (बाबा) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी यांनी केले.
यावेळी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक मुखेकर बाबा शास्त्री, ज्ञानेश्वरी मंदिराचे मठाधिपती विष्णु महाराज केंद्रे, पंडित महाराज क्षिरसागर, नामदेव महाराज चव्हाण, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, नगरसेवक सचिन गिलबिले, माजी नगरसेवक अशोक कांबळे, राधाकृष्ण महाराज गरड, रामदेव आप्पा चव्हाण, ज्ञानेश्वर महाराज पिंगळे, सुदाम म. शास्त्री, भास्कर म. पवार, लक्ष्मण म. खरात, परशुराम म. गिराम, सखाराम गायवळ यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.