भोपाळ – मध्यप्रदेशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते रघुनंदन शर्मा यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यावर सडकून टीका केली आहे. सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली आहे अशी टिपण्णी त्यांनी केली आहे.
शर्मा हे भाजपचे माजी राज्यसभा सदस्यही आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर ही टीका करताना या मंत्र्यांनी राष्ट्रवाद मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी सुचनाही त्यांना केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणून कृषी मंत्री काही करू पहात आहेत पण शेतकऱ्यांनाच जर तुमचे उपकार नको असतील तर तुमच्या या कामाची गरजच काय?. ज्यांनी नागडेच राहयचे ठरवले आहे त्यांना कपडे घालण्याची सक्ती कशाला करता असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे की सत्तेची मस्ती तुमच्या डोक्यात गेली आहे.
आपले सरकार आज कॉंग्रेसच्याच धोरणांची री ओढताना दिसते आहे. ते आपल्या हिताचे नाही. संघाच्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यागातून आणि निष्ठेच्या सेवेतून आपल्या मातृभूमीची सेवा केली आहे.त्यातून हे राष्ट्रवादी सरकार केंद्रात स्थापन झाले आहे याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. त्यांनी ही पोस्ट नेमकी कशाच्या संबंधात केली आहे याचा तपशील मात्र यात नमूद करण्यात आलेला नाही.