बर्लिन – भारताच्या विकासाला गती देण्यपासून लोकल फॉर वोकल, स्टार्टअप, डीबीटीसह कलम 370 हटवण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्याच दरम्यान त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “भारत माता की जय’ने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जर्मनीला यापूर्वीही मी आलो आहे, तुमच्यापैकी अनेकांना भेटलो सुद्धा आहे. या ठिकाणी तरुणांची वर्दळ अधिक आहे. त्यामुळे तरुणाईचा उत्साहही आहे. जर्मनीत भारतीयांची संख्या कमी असली तरी तुमच्या स्नेहात, उत्साहात अजिबात कमी नाही.
जेव्हा आपण भारतीयांच्या विविध श्रेणींबाबत भाष्य करतो त्यावेळी भारतात राहणारे लोकच नाही तर तुम्हीही त्यात सामील होतात. 21व्या शतकातील हा काळ भारतासाठी आम्हा भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आजचा भारत निर्धाराने पुढे जात आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की, जेव्हा एखादा व्यक्ती काही ठरवतो तेव्हा देश नव्या मार्गाने चालतो आणि इच्छित स्थळ गाठून दाखवतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी म्हणाले, एक बटण दाबल्याने भारतातील राजकीय अस्थिरता संपली. एक बटण दाबताच भारताने तीन दशकांची अस्थिरता संपवली. भारतातील मतदारांनी 30 वर्षांनंतर 2014मध्ये पूर्ण बहुमताचे सरकार निवडून दिले. भारतातील मतदारांची ताकद माहीत आहे.
आज देश प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. पूर्वी तुम्ही जिथे जाल तिथे काम सुरू असल्याचा फलक लावला होता. आता देशही तोच आहे, फाइलही तीच आहे. सरकारी यंत्रणाही तीच आहे पण देश बदलला आहे.
आता भारत लहान विचार करत नाही. भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी सर्वात वेगवान आहे. 6 लाख गावे ऑप्टिकल फायबरने जोडली गेली आहेत. आता 5जी येत आहे असेही मोदी म्हणाले.