लखनौ – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर अनेक संतांनी त्यांच्या मृत्यूचे स्वरूप आणि आत्महत्येच्या चिठ्ठीच्या सत्यतेवर शंका उपस्थित केली आहे.
पोलीस माहनिरीक्षक के. पी. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कक्षातच सिलींगला गळफास घेतलेल्या अवस्थेत महंत गिरी यांचा मृतदेह आढळला. त्यांची एक कथित सात – आठ पानी आत्महत्येची चिठ्ठी तेथे सापडली आहे. त्यात महंतानी आपण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे आणि आपले आयुष्य संपवत असल्याचे नमूद केले आहे. तसेच एका शिष्याच्या वर्तनाने अस्वस्थ असल्याचे नमूद केले आहे.
प्राथमिक तपासावरून ही आत्महत्या असल्याचे वाटत आहे. मात्र पोस्ट मार्टेम आणि न्यायवैद्यक चाचणी अहवालातून याबाबतचे नेमके सत्य उलगडेल. आखाडा परिषदेचे पदाधिकारी आल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराचा निर्णय घेतील, असे सिंह यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अनेक संत आणि धार्मिक संस्थांनी मृत्यूच्या स्वरूपाबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. गिरी यांच्या मृत्यूमागे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला आहे. महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येच्या चिठ्ठीत त्यांचे शिष्य योगगुरू आनंद गिरी यांच्या नावाचा उल्लेख आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या चिठ्ठीत त्यांनी आनंद गिरी मानसिक त्रास देत असल्याचे नमूद केले आहे.
अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस जितेंद्रानंद सरस्वती यांनी या चिठ्ठीच्या वैधते बाबत शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले, नरेंद्र गिरी सहीसुध्दा क्वचित करत असत. तेंव्हा त्यांनी एवढे मोठे पत्र कधी लिहले?
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येईल. दोषींना कठोर शासन करण्यात येईल. सरकार या प्रकरणात सर्व बाजूने तपास करण्यास तयार आहे. जर गरज भासली तर आम्ही सीबीआयकडे तपास सोपवण्यास तयार आहोत. आखाडा परिषदेच्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण केल्यावाचून सरकार मागे हटणार नाही.
दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयात महंत गिरी यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
अटक केल्यानंतर आनंद गिरी यांनी महंत नरेंद्र गिरी हे आत्महत्या करूच शकत नसल्याच दावा केला. ते म्हणाले, त्यांची हत्या केली असावी. त्याचा संबंध मोठ्या रकमेशी असावा. तसेच यात मठातील अनेक जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. दरम्यान मृत्यूपुर्वी पाच सहा तास आधी महंतांनी केलेल्या फोनच्या कॉल डिटेल्सच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. त्यांच्याशी संवाद साधलेल्या व्यक्तींचे जबाब घेण्यात येत आहेत.