मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपतर्फे आता या प्रकरणी राज्यसभा खासदार संजय राऊत व मंत्री आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजप प्रवक्ते निखिल आनंद यांनी, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे गेल्यानंतर महाराष्ट्र सरकारला कशाची भीती वाटत आहे? असा प्रश्न उपस्थित केलाय. याखेरीज त्यांनी महाराष्ट्र सरकारवर परिस्थितीशी छेडछाड व पुरावे मिटवल्याचा गंभीर आरोप देखील लगावलाय.
काँग्रेस-राष्ट्रवादीवरही प्रश्नचिन्ह
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या सोबतच राष्ट्रवादी व काँग्रेसची भूमिका देखील संशयास्पद असल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला. आदित्य यांच्याप्रमाणेच राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी देखील मौन सोडायला हवे. अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली.
संजय राऊत यांची भूमिका
तत्पूर्वी संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सद्रामधून सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर भाष्य केलं होत. यामध्ये त्यांनी, बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला होता.
“सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला पडायचे कारण नव्हते. सुशांतचे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक एफआयआर दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले.
याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुस-या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे,” असंही ते म्हणाले.