रत्नागिरी – राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे भाजपात असते, असा खळबळजनक दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केलाय. रत्नागिरी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.
तत्पूर्वी, जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला होता. पाटील यांच्या याच टीकेला प्रतिउत्तर देताना राणे यांनी, “आज महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली होती. पाटलांच्या इस्लामपुरात जाऊन हे सर्व मी उघड करणार आहे.” असा खळबळजनक दावा केला
काय म्हणाले होते जयंत पाटील?
राणे सातत्याने सरकारवर टीका करत असल्याबाबत पाटील यांना विचारण्यात आले यावर त्यांनी “गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं” अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली होती.
महाविकास आघाडी सरकार पडणार असं सांगत भाजपा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. मात्र, आम्ही तर एक वर्षही पूर्ण केलं आहे. त्यामुळे राणेंच्या टीकेला गंभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.