नारायणगाव -पहिल्या टर्मच्या पहिल्याच वर्षी लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या टॉप फाइव्ह खासदारांमध्ये समावेश आणि आता जाहीर झालेला संसदरत्न पुरस्कार म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचा दुहेरी सन्मान आहे. हा पुरस्कार मी माझ्या मतदारांना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अर्पण करीत आहे, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तीनच दिवसांपूर्वी पुण्यातील परिवर्तन संस्थेच्या अभ्यास अहवालात लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या टॉप फाइव्ह खासदारांमध्ये डॉ. कोल्हे यांनी लोकसभेत 202 प्रश्न विचारून दुसरा क्रमांक पटकावला होता. त्या पाठोपाठ लगेचच पहिलीच टर्म असूनही सतराव्या लोकसभेच्या पहिल्याच वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाला हा जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ केल्याचे प्रतीक आहे, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
देशाचे, राज्याचे महत्त्वाचे विषय तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकभावना आणि शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी बांधवांचे प्रश्न मांडण्याचा शब्द मी मतदारांना दिला होता. त्याची पूर्तता पहिल्याच वर्षी मिळालेल्या “संसदरत्न’ पुरस्काराने करता आली हे माझे भाग्य समजतो असेही डॉ. कोल्हे म्हणाले.