Narayangaon : येडगाव-नारायणगाव रस्त्यावरील एका कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याने सुमारे ६०० गोणी कांद्याचे नुकसान झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती हेमंत कोल्हे यांनी दिली. शेतकरी सावता चिमाजी कोल्हे यांच्या मालकीच्या अडीच एकर शेतीत श्रीहरी बनकर यांनी अर्ध्या वाट्याने कांद्याची लागवड केली होती. बाजारात कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शेतकरी चाळीजवळ गेले असता परिसरात युरिया पडलेला आढळून आला. संशय आल्याने त्यांनी कांदा चाळ उघडून पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने चाळीवर चढून साठवलेल्या कांद्यात ओला युरिया टाकल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. कांदा मालकाचा कोणाशीही वाद नसताना हा प्रकार कोणी आणि कोणत्या हेतूने केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित आरोपींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.