-माधव विद्वांस
ज्येष्ठ मराठी साहित्यिक, नाटककार, कवी, दिवंगत ना. सी. फडके यांची आज जयंती. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट, 1894 रोजी नगर जिल्ह्यातील कर्जत येथे झाला. त्यांचे वडील सीताराम म. फडके हे संस्कृतपंडित व वेदव्यासंगी होते.
सीताराम यांनी “वेदान्तनिदर्शन’ हा व्यासंगपूर्ण ग्रंथ लिहिला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण वडूज (जि. नाशिक), बार्शी (जि. सोलापूर), पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी व माध्यमिक शिक्षण पुणे येथे नूतन मराठी विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन कॉलेजात झाले. त्यांना युगप्रवर्तक मराठी कादंबरीकार, चरित्रलेखक, कथाकार, मराठी लघुनिबंधाचे आद्यप्रवर्तक आणि साहित्यसमीक्षक म्हणून साहित्यक्षेत्रात मानले जाते.
वर्ष 1916 मध्ये न्यू पूना कॉलेजात (आजचे स. प. महाविद्यालय) प्राध्यापक म्हणून रूजू झाले. पण महात्मा गांधींनी पुकारलेल्या असहकार चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. दरम्यान, केसरी व मराठा ह्या पत्रांच्या कचेरीत उपसंपादक म्हणून ते काम पाहू लागले. कालांतराने या चळवळीपासून दूर होऊन पुन्हा प्राध्यापकी करण्याचे ठरविले, तसेच राजकारणापासून दूर राहण्याचे ठरविले. त्यानंतर दिल्ली, सिंध, हैदराबाद, नागपूर, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी महाविद्यालयांतून तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजातून 1949 मध्ये ते निवृत्त झाले. उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी मोठा लौकिक मिळविला होता. त्यांच्या दुसऱ्या पत्नी कमला फडके या पण लेखिका होत्या.
वर्ष 1912 मध्ये “मेणाचा ठसा’ ही त्यांची पहिली कथा कोकिळ या मासिकात प्रसिद्ध झाली. वर्ष 1917 मध्ये इंग्रजी कादंबरीकार मारी कोरेली यांच्या “टेंपरल पॉवर’ या कादंबरीच्या आधारे लिहिलेली “अल्ला हो अकबर’ ही त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी अनेक कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या. मात्र, कादंबरीलेखक म्हणूनच वाचकवर्गात ते प्रिय झाले. “अधीर मन बावरे’ या हिराबाई बडोदेकर यांनी गायलेल्या “युगांतर’ या नाटकातील गीतासह त्यातील चारही नाट्यगीते त्यांनी लिहिली होती.
लेखनकला ही कलेसाठीच असते व वाचकांना सौंदर्यदर्शन घडविणे व आल्हाद देणे हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी वाचकांना हवेसे वाटणारे लाघवयुक्त कादंबऱ्यांचे लेखन केले. कुलाब्याची दांडी (1925), जादूगार (1928), दौलत (1929), अटकेपार (1931), निरंजन (1932) या त्यांच्या आरंभीच्या कादंबऱ्या. त्यातील प्रणयरम्यता, कुशल व्यक्तिरेखन, आकर्षक संवाद आणि मोहक भाषाशैली यामुळे वाचकांच्या मनाची पकड घेतली.
त्यानंतरच्या उद्धार (1935), प्रवासी (1937), अखेरचं बंड (1944) या कादंबऱ्यांतून प्रणयरम्यतेबरोबर त्यांनी गंभीर विषयांची मांडणीही केली आणि महाराष्ट्रातील काही असामान्य व्यक्तिमत्त्वांचे दर्शन त्यातून घडविले. तथापि, हे लिहिताना कादंबऱ्या चरित्रात्मक होऊ दिल्या नाहीत. त्यांनी पन्नास-साठ वर्षांतील महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा उपयोग करून झंझावात, झेलम, उजाडलं! पण सूर्य कुठे आहे? अशा काही कादंबऱ्या लिहिल्या.
रत्नागिरी येथे 1940 साली भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. वर्ष 1962 मध्ये त्यांना पद्मभूषण किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता. पुणे येथे 22 ऑक्टोबर, 1978 रोजी त्यांचे निधन झाले.