मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवाव्या लागलेल्या उद्धव ठाकरे यांना आज आणखी एक मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पक्षाचे नाव ‘शिवसेना’ व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाला याचा निर्वाळा दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण एकनाथ शिंदे व समर्थकांच्या पारड्यात टाकले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. “महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे पक्षाचे शिवसेना नाव व धनुष्यबाण निशाणी हे दोन्ही शिंदे गटाला मिळाल्याबद्दल अभिनंदन.”, असे ट्विट करत राणे यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे पक्षाचे शिवसेना नाव व धनुष्यबाण निशाणी हे दोन्ही शिंदे गटाला मिळाल्याबद्दल अभिनंदन.
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 17, 2023
प्रभू श्रीरामांचा धनूष्य रावणाकडे- राऊत
केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निकाल अपेक्षितच होता. ज्या पद्धतीने हे सरकार बनलं त्यानुसार खोक्यांचा वारेमाप वापर कुठपर्यंत झाला हे स्पष्ट होते. हा सत्याचा नाही तर खोक्यांचा विजय आहे.
प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण जर रावणाला मिळत असेल तर, सत्यमेव जयते खोडून असत्यमेव जयते असे लिहायला हवे. जो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी, लाखों शिवसैनिकांनी रक्त सांडून उभा केला, तो पक्ष बाजारबुनगे विकत घेतात. त्यामुळे निवडणूक आयोगावरील विश्वास जनतेने गमावला आहे.
या आदेशातल्या सर्व स्वायत यंत्रणा यांना गुलाम करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यातील हे पहिले पाऊल आहे. निवडणूक आयोग आहे. न्यायालय गुलाम असल्यासारखं वागत आहे. या निर्णयाला नक्कीच आव्हान दिले जाईल. चाळीस बाजार बुनगे बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह जर कुणी विकत घेणार असेल तर लोकशाही वरील विश्वास उडून गेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाकी असतांना निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्रवर अन्याय आहे. याशिवाय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई ताब्यात घेण्यासाठीचा हा फास आहे. माझा आणि निवडणूक आयोगावर विश्वास नाही असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे. या निकालाच्या माध्यमातून देशातील स्वायत्त संस्था केंद्रसरकारच्या हातचे बाहुले बनल्याचेच प्रतित होत आहे. या निर्णयामुळे प्रभू श्रीरामांचा धनूष्य रावणाच्या हाती सोपविण्यात आला आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, लोकशाहीला बहुमताला महत्त्व असते. आज आपण पाहिले राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. हा बहुमताचा विजय आहे. लोकशाहीचा विजय आहे. मी पुन्हा एकदा सांगतो हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे. या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो.