मुंबई – कोकणात उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाबाबत नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये सध्या श्रेयाची लढाई सुरू आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र त्यांच्या उपस्थितीला नारायण राणे यांनी आक्षेप घेतला होता.
या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनी यायलाच पाहिजे असे नाही असे विधान नारायण राणे यांनी केले होते. पण आता मात्र राणे यांचा या बाबतीतला सूर बदलला असून मुख्यमंत्री या उद्घाटनाला आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे राणे यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहिले तर राणे आणि ठाकरे त्यावेळी एकाच व्यासपीठावर आलेले पाहायला मिळणार आहे.
चिपी विमानतळाच्या उभारणीत नारायण राणे किंवा त्यांच्या दोन्हीं मुलांचे काडीचेही योगदान नाही असे वक्तव्य करीत नारायण राणे यांच्यावरच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आक्षेप घेतल्याने या विषयीचा वाद चिघळला होता. केंद्रीय नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.