एकदा काय झाले, नारदमुनीच्या मनातील “मीच देवाचा श्रेष्ठ भक्त. मीच त्याच्या जवळचा हा अहंकार दूर करायचा होता. तेव्हा श्रीकृष्णानी काय केले. जसे का नारदमुनी हे त्यांची भटकंती करत करत द्वारकेस श्रीकृष्णाच्या दर्शन भेटीस आले, त्या वेळी श्रीकृष्ण झोपून राहिले.
नारदांनी पुढे होऊन, “”देवा काय होतंय”, असं विचारले. तेव्हा ते म्हणाले, “”नारदमुनी, माझं डोकं फार दुखते आहे. अनेक उपाय केले पण ते काही थांबत नाही.” देव अगदी दु:खी कष्टी चेहऱ्याने म्हणाले.
त्यावर नारदांनी विचारले, “”देवा, यावर काही तरी उपाय हा असलाच पाहिजे.” तेव्हा देव म्हणाले, “”एक उपाय आहे? जर माझ्या एखाद्या भक्ताने त्याच्या पायाखालची माती मला दिली. तिचा लेप डोक्यावर लावला. तर माझी डोकेदुखी थांबेल.”
तेव्हा आपल्या पायाखालची माती देवाच्या डोक्याला लावायला देणारा कोणी भक्त मिळतोय का, हे शोधायला नारदमुनी अवघ्या त्रैलोक्यात फिरले. तरी आपल्या पायाखालची माती देवाच्या डोक्याला लावून पापाचे धनी व्हायला कोणीच तयार होईना.
शेवटी जेव्हा नारदमुनी मथुरा वृंदावनास गेले. त्या लोकांनी मात्र मोठ्या प्रेमाने आपल्या पायाखालची चिमूट चिमूट अशी ओंजळभर माती नारदांना दिली. तसेच त्या बरोबरच त्यांनी कृष्णासाठी एक निरोप पाठविला की, “”कृष्णा, आम्ही आमच्या पायाखालची माती दिली म्हणून आम्हास पाप लागले आणि आम्ही नरकात गेलो तर तिथे तू आमचा उद्धार करायला ये.” तो निरोप नारदमुनींनी ऐकला आणि संभ्रमात पडले.
त्यांनी ती माती आणली. तिचा लेप कृष्णाच्या मस्तकावर लावला अन् त्या चरणरजाच्या सुगंधाने अन् स्पर्शाने देवाची डोकेदुखी एकदम थांबली. श्रीकृष्णाने नारदांना प्रश्न विचारला, “”मुनिवर! आपल्या पायाखालची माती देणारा श्रेष्ठ भक्त तुम्हाला कुठे मिळाला स्वर्गात की पाताळात?”
त्यावर नारदांकडून मथुरा वृंदावनाचं नाव ऐकलं. आपल्यासाठी स्वत:च्या पायाखालची माती देणाऱ्या त्या गोप-गोपिकांचा भोळा भक्तिभाव देवास समजला. तशी श्रीकृष्णाची कळी खुलली. ते हसू लागले. मग कृष्ण नारदांना म्हणाले, “”काय! त्या अडाणी लोकांनी माती दिली. आपल्या पायाखालची माती देऊन पापाचे धनी होताना त्यांना काही भीती वाटली नाही. ते नरकात जायला घाबरले नाहीत.”
देवाचे बोलणे ऐकले अन् दुसऱ्याच क्षणी नारदमुनी मनोमन खजील झाले. मी स्वत:ला एवढा मोठा श्रेष्ठ भक्त मानतो. पण मला आपल्या पायाखालची माती देण्याची इच्छा का झाली नाही, असा प्रश्न नारदमुनींना पडला.