मुंबई – महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष आता अयोध्येकडे धाव घेताना दिसत आहेत. मनसे आणि शिवसेनेकडून यापूर्वीच अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 5 जूनला तर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे 10 जूनला राम नगरी अयोध्येत जाणार आहेत. यादरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी कोणताही गाजावाजा न करता अयोध्येला जाऊन श्री रामाचे दर्शन घेतले. त्यानंतर, आता कॉंग्रेस पक्ष देखील अयोध्येला जाण्याच्या शर्यतीत उतरला आहे.
अयोध्येतील दशरथ गादीचे महंत ब्रिजमोहन दास यांनी सोमवारी(दि.09 मे) महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेत त्यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे. याबाबत नाना पटोले यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. नाना पटोले यांनी जरी हे निमंत्रण स्वीकारले असले तरी ते अयोध्या दौऱ्यावर कधी जाणार आहेत, हे निश्चित झालेले नाही.
अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत ब्रिजमोहनदास यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय टिळक भवन, दादर येथे माझी भेट घेतली. pic.twitter.com/mHHlHH5Imc
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 9, 2022
नाना पटोले यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,”अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत ब्रिजमोहनदास यांनी सोमवारी(दि.09) महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्यालय टिळक भवन, दादर येथे माझी भेट घेतली. यावेळी त्यांनी मला अयोध्येला भेट देऊन प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले. याप्रसंगी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत मी त्यांचे आभार व्यक्त केले.”