मुंबई – कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदभार स्विकारल्यापासून ते सातत्याने चर्चेत आहेत. त्यांनी जवळपास दररोजच एक खळबळजनक विधान करण्याचे सपाटा लावला आहे. आतापर्यंत त्यांचे कोणी त्यांचे थेट समर्थन केले नव्हते. मात्र त्यांच्या भूमिकेशी विसंगत असे मतही कोणी मांडले नव्हते.
मात्र उध्दव ठाकरे सरकार आपल्यावर पाळत ठेवते आहे असे वादग्रस्त आणि सत्ताधारी आघाडीला अडचणीत आणणारे विधान केल्यावर चित्र बदलले आहे. त्यानंतर नानांना ज्यांनी जे काय सुनवायचे ते सुनावले आहे. मात्र त्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या कॉंग्रेस पक्षाकडून त्यांचा बचाव करण्याकरता आता कोणी पुढे आले नसल्यामुळे अखेर नानांनाच आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेल्याचा दावा करत वेळ मारून नेण्याची वेळ काल आली.
ठाकरे सरकारचे आपल्याकडे लक्ष आहे. रोज सकाळी 9 वाजता त्यांना आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्याबाबत माहिती पोहोचते अशा आशयाचे विधान नानांनी लोणावळ्यात केले. त्यावरून गदारोळ उडाला. साधारणत: विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप केले जातात अथवा त्यांच्या हालचालींची माहिती ठेवली जाते अशी चर्चा असते. मात्र आपल्याच सत्ताधारी आघाडीतील प्रमुख नेत्यावर पाळत ठेवली जाण्याचा आरोप स्वत: त्याच नेत्याने करणे हा प्रकार गंभीर होता.
त्यामुळे सरकारमधील सहकारी पक्षांच्या नेत्यांनी नानांना जे काही टोमणे मारायचे ते मारले. विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेली टिप्पणी तर वर्मी घाव घालणारी होती. छोट्या माणसाबाबत काय बोलणार अशा आशयाचे विधान पवार यांनी केले.
पटोले चुकीचे बोलले अथवा नाही, हा नंतरचा प्रश्न. मात्र ते एका मोठ्या राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या संदर्भात काही टिप्पणी झाली तर पक्षातील अन्य मंडळींनी पुढे सरसावणे अपेक्षित होते. ते याबाबतीत झाले नाही.
कॉंग्रेसच्याच एका ज्येष्ठ नेत्याने शरद पवार मोठे नेते आहेत असे सूचक विधान करून पटोले यांचीच बोळवण केली. तर महाराष्ट्रात लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीतुन नियुक्त केलेल्या नेत्याने संपूर्ण प्रकरणाचे खापर माध्यमांवर फोडले. माध्यमांनीच बातम्या चुकीच्या पध्दतीने प्रसारीत केल्या असा दावा त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर पटोले यांची पाठराखण करणे कॉंग्रेस नेत्यांना अशक्य झाले आहे का, की अन्य काही कारणामुळे तो पक्ष गप्प बसून सगळे पाहतो आहे असा चर्चांचा नवा कट्टाही सुरू झाला आहे.