मुंबई – राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महिला अत्याचाराच्या घटनांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला भाजपने धारेवर धरले असतानाच भाजप नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. यावरून आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याप्रकरणी भाजप नेत्यांचे मौन का? असा प्रश्न उपस्थित करत, ‘भाजपसाठी महिला अत्याचार फक्त राजकारणाचा मुद्दा आहे दुसरं काही नाही’ असा आरोप लगावला.
नेमकं काय आहे प्रकरण?
भाजप नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्याची तक्रार आमदार आणि खासदार यांच्याकडे केली म्हणून नगरसेविका आणि सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप पीडित समाजसेविकेने केला आहे.
या विरोधात महिनाभरापूर्वी तक्रार करूनही गुन्हा दाखल झाला नाही. अखेर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे दाद मागितल्यावर बोरीवली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेत पत्र लिहिणारे कोणत्या बिळात लपलेत माहीत नाही – नाना पटोले
याबाबत ट्विट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, “महिला अत्याचारवरुन गळे काढणारे भाजप नेते त्यांच्या नगरसेविकेच्या कार्यालयात झालेल्या विनयभंगावरुन चकार शब्द काढायला तयार नाहीत. स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेत पत्र लिहिणारे कोणत्या बिळात लपलेत माहीत नाही. भाजपसाठी महिला अत्याचार फक्त राजकारणाचा मुद्दा आहे दुसरं काही नाही!” अशी टीका केली.