मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चुकीच्या धोरणांमुळे भाजपचे सरकार अपयशी ठरले आहे. या मुद्द्यांपासून भरकटवण्यासाठी आणि विरोधकांवर दबाव निर्माण करण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. परमवीर सिंग हे त्यावेळी मुंबई पोलीस कमिशनर होते. त्यांना त्या काळातच कारवाई झाली असती तर हा जो घोटाळा बोलला जातोय त्याचा मूळ उद्देश काय आहे तो समोर आला असता.
- मात्र राजकीय द्वेषापोटी आता राज्य सरकारवर कारवाई केली जाते, असा हल्लाबोल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी कॉंग्रेसला फरक पडणार नाही, अशा शब्दात त्यांनी भाजप-मनसेच्या संभाव्य युतीवर टीका केली.
राज्यात भाजप-मनसे संभाव्य युतीची जोरदार चर्चा आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप संसार थाटण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये मनसे भाजप युतीचा नारळही फुटला आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ही काहीशी खोचक कमेंट केली. तसेच देशातील विविध राज्यात शिवसेना निवडणूक लढवत आहेत.
शिवसेना हा आमचा महाराष्ट्रात मित्र पक्ष आहे. त्यांच्या पक्षाच्या निर्णयानुसार जर गोव्यामध्ये शिवसेना निवडणूक लढवत असेल तर त्यांच्या निर्णयाचे स्वागतच आहे, असेही पटोले म्हणाले.