कात्रज, दि. 6 (प्रतिनिधी) -महापालिकेत कात्रज परिसराचा समावेश होऊन 25 वर्षे लोटली तरीही मूलभूत सुविधा व विकास प्रकल्पांच्या निधींबाबत कात्रजला डावलले जात आहे. बीडीपी आरक्षण तीनपट कर, नव्याने समाविष्ट गावातील अन्यायकारक आरक्षणे यामुळे मोठा अन्याय या परिसरावर होत आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार, आमदार यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याने मागील वर्षी दसऱ्यालाच माझे आवडते हातातले “घड्याळ’ काढले. त्या सूचक इशाऱ्यानंतरही कोणतेच निर्णय कात्रजच्या विकासासाठी पक्षपातळीवर घेण्यात आले नाही. अखेर, आज राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह असलेले घड्याळ काढून ठेवतो, अशा शब्दांत नमेश बाबर तसेच माजी नगरसेविका अमृता बाबर यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकला. तसेच “कात्रज विकास आघाडीच्या’ माध्यमातून प्रशासनाविरोधात आपल्या हक्क मागण्यांची लढाई सुरू ठेवणार, अशी घोषणा करीत पुढील दिशा जाहीर केली.
यावेळी कात्रज, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी व आंबेगाव या परिसरातील आजी-माजी सरपंच, उपसरपंचांनी आपली मते मांडली.महापालिका प्रशासनाने आपल्यावर कर लावते. मात्र, त्याप्रमाणे विकासकामे केली जात नाहीत, अशी भूमिका अनेकांनी मांडली. महापालिका प्रशासनावर तसेच राष्ट्रवादीच्या कात्रज परिसराबाबतच्या धोरणाविषयही अनेकांनी नाराजी व्यक्त करीत नमेश बाबर यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीरपणे सांगितले.
यापुढे कात्रजच्या सर्वांगिण विकासासाठी “कात्रज विकास आघाडी’च्या माध्यमातून एकत्रितरीत्या प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका अमृता बाबर, माजी सरपंच दीपक गुजर, सुनील मांगडे, निलेश धनावडे, स्वराज बाबर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दांडिया स्पर्धेतील बक्षीस वितरण व कात्रजच्या विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रवृत्तीचे राक्षस दहन करण्यात आले.
स्व. अजित बाबर यांनी युवकांना सोबत घेत पुण्यामध्ये पक्ष वाढविण्याचे कार्य शेवटपर्यंत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेससह कोणत्याच पक्षाने कात्रजला काही दिले नाही. आता फक्त विचारांची लढाई लढून कात्रजच्या विकासासाठी सर्वांनी सोबत या, नुसता पाठिंबा नको. कात्रजचा सर्वांगिण विकास हेच आपले ध्यये आहे. – नमेश बाबर, “कात्रज विकास आघाडी’