मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जनता देखील या मागणीबाबत सकारात्मक आहे. आपण यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन वेल्हा तालुक्याचे नाव राजगड करावे विनंती त्यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकीक आहे तो किल्ले राजगड वेल्हा तालुक्यात आहे. येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार पाहिला. स्वराज्याचे स्वप्न पाहिले,जपले व ते प्रत्यक्षात आणले.
मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामुळेच ज्या वेल्हा तालुक्यात हा किल्ला आहे. त्या किल्ल्याचे नाव त्या तालुक्यात देण्यात यावे अशी आमची मागणी आहे.
विशेष म्हणजे जुन्या दस्तावेजात म्हणजे अगदी शिवकाळापासून ते १९४७ सालापर्यंत ‘राजगड तालुका’ असाच उल्लेख आढळतो. शासकीय मुद्रणालयाने १९३९ साली प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात तालुका राजगड असा उल्लेख आहे. याशिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही तालुका राजगड उल्लेख आढळतो. हे सर्व मुद्दे लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे.