बीड : भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी गुरुवारी पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्याकांडामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. धनंजय मुंडे यांच्या गालावरून वारे गेले. त्यामुळे एक चांगली वाणी बंद पडली. ही वाणी पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रार्थना करा, असे ते म्हणाले आहेत.
बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथील श्रीक्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताहाची आज सांगता झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुंडे हे भगवान गडाचे आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांचे टेन्शन घेऊ नका. आज ते आले नाही. पण त्यांच्यासाठी आपण मोठा कार्यक्रम करू. त्यांच्याकडून पुन्हा समाजकल्याणाचे काम व्हावे एवढेच मी म्हणेन.
धनंजय मुंडे आजच्या सांगता समारंभाला हजर राहणार होते. पण काही कारणांमुळे त्यांना येता आले नाही. याविषयी बोलताना नामदेवशास्त्री म्हणाले, बीडचे भूमीपुत्र धनंजय मुंडे आज आपल्या कार्यक्रमाला येणार होते. पण त्यांच्या हेलिकॉप्टरला क्लिअरन्स मिळाला नाही. त्यामुळे ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. त्यांच्या हेलिकॉप्टरला दोन तास परवानगी मिळाली नाही. ते हेलिकॉप्टरच्या शेजारी बसूनच होते.
कोण आहेत नामदेव शास्त्री ?
नामदेव महाराज शास्त्री हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील भगवानगडाचे महंत आहेत. तसेच नामदेव शास्त्री हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक असून कीर्तनकार व प्रवचनकार आहेत. मानसिक समस्या त्यावरील उपाय आणि अध्यात्मिकता वाढण्यास मदत करण्यासाठी ते विविध विषयांवर प्रवचन देतात. परंपरेविषयी त्यांना अधिक माहिती असून आधुनिक काळातील मानसिक समस्यांवर ते उपाययोजना सांगतात. नामदेव महाराज शास्त्री यांचे अधिकृत युट्युब अकाउंट देखील आहे.