भोपाळ – भारतीय संघाकडून खेळण्याची फारशी संधी न मिळालेल्या, पण देशातंर्गत क्रिकेट स्पर्धेत यष्टिमागे सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम करणारा यष्टिरक्षक फलंदाज नमन ओझा याने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
भारताचे प्रतिनिधित्व करताना केवळ 1 कसोटी, 1 एकदिवसीय आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळालेल्या नमन ओझाने रणजी करंडक स्पर्धेत मात्र, यष्टिरक्षक म्हणून आपला लौकिक राखला आहे. त्याने 55 यष्टिचीत करताना 415 झेल घेतले आहेत. त्याचबरोबर अ श्रेणीत त्याने 44 यष्टिचीत करताना 155 झेल घेतले आहेत. ही देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. आभासी पत्रकार परिषदेत ओझाने आपली निवृत्ती घेतली.
ओझाने 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर त्याचवर्षी त्याने झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 चा पहिला सामना खेळला. एक मात्र, कसोटी सामना तो 2015 मध्ये कोलंबोत श्रीलंकेविरुद्धच खेळला. नमनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अल्पकाळ ठरली असली, तरी प्रथम श्रेणी सामन्यात त्याने आपला डंका वाजवला. त्याने 146 प्रथमश्रेणी सामने खेळताना 9,753 धावा केल्या. यात 22 शतके झळकावली.
अ श्रेणीचे 143 आणि 182 टी 20 सामने खेळताना नमनने 4 हजार 278 आणि 2 हजार 972 धावा केल्या. गेल्यावर्षी उत्तर प्रदेशविरुद्ध तो मध्य प्रदेशकडून अखेरचा रणजी करंडक सामना खेळला. त्याने मध्य प्रदेशाचे नेतृत्वही केली. आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाचे प्रतिनिधित्व केले.