विविधा : माधव विद्वांस
वर्ष 1940 ते 1960 या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका, नलिनी जयवंत यांची आज जयंती..त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1928 रोजी मुंबई येथे झाला. नलिनी जयवंत यांनी वयाच्या सातव्या वर्षीच आकाशवाणीवर कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यांनी तेथे गायन स्पर्धेत प्रावीण्यही मिळविले होते.
त्यांचा चंदेरी दुनियेतील प्रवेश एका मजेदार प्रसंगाने झाला, नलिनी जयवंत आपल्या पालकांबरोबर चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी नॅशनल स्टुडिओचे निर्माता-दिग्दर्शक चमनलाल देसाई व त्यांचे चिरंजीव वीरेंद्र देसाई हे पण चित्रपट पाहण्यासाठी आले होते.त्यावेळी त्यांनी लहान नलिनीला पाहिले व आपल्या चित्रपटात घेण्याचे ठरविले.चित्रपट संपल्यावर गर्दीमध्ये नलिनी गायब झाल्या. मात्र काही दिवसांनी हे पितापुत्र शोभना समर्थ यांच्या घरी कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांना नलिनी तेथे आलेल्या दिसल्या.
शोभना समर्थ या त्यांच्या मामेबहीण होत्या. त्यावेळी नलिनी जयवंत वयाच्या अवघ्या 13/14 वर्षांच्या होत्या.त्याच वेळी वीरेंद्र देसाई यांनी नलिनीसमोर चित्रपटामध्ये काम करण्याचा प्रस्ताव दिला. तथापि, त्यासाठी आईवडिलांची परवानगी मिळेल याची नलिनी यांना खात्री नव्हती. परंतु वीरेंद्र देसाई यांनी त्यांच्या वडिलांची संमती मिळविली. नलिनी जयवंत यांचा वीरेंद्र देसाई दिग्दर्शित “राधिका’ हा वर्ष 1941मध्ये रिलीज झालेला पहिला चित्रपट होता.
अभिनयाबरोबर या चित्रपटाच्या दहापैकी सात गाण्यांमध्ये नलिनी जयवंत यांचा आवाज होता. वर्ष 1941मध्ये राधिका, निर्दोष आणि बहेन असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यांचे एकूण 57 चित्रपट प्रदर्शित झाले.
वर्ष 1950 मध्ये त्यांनी जेव्हा समाधी आणि संग्राम या चित्रपटांत अशोककुमार यांच्याबरोबर काम केले त्यावेळी त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. समाधी या चित्रपटात सुभाषचंद्र बोस आणि भारतीय देशभक्तीपर कथानक होते. “संग्राम’ यात एक गुन्हेगारी कथानक होते. ज्यात नालिनींनी अँटी-हिरो सुधारण्यासाठी नायिका साकारली होती. वर्ष 1958मध्ये रिलीज झालेल्या “काला पानी’ या चित्रपटातील त्यांची भूमिका कौतुकास्पद ठरली होती.
वर्ष 1958मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला. नलिनी जयवंत यांना 1950च्या दशकातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून गौरवण्यात आले होते. बॉंबे रेसकोर्स या वर्ष 1965च्या चित्रपटानंतर 15 वर्षांनी वर्ष 1980मध्ये “बंदिश’ या चित्रपटात त्या दिसल्या.
वर्ष 1983 मधील अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा “नास्तिक’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. नलिनी जयवंत यांचे 20 डिसेंबर 2010 रोजी वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्याबरोबर कोणीही नव्हते. त्यांच्या निधनानंतर 3 दिवसांनी त्यांचे शव रुग्णवाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या पुतण्याने नेले. त्यावेळी आसपासच्या लोकांना त्यांचे निधन झाल्याचे कळले.