नवी दिल्ली – निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पश्चिम बंगालमधील प्रचार एक दिवस आधीच गुंडाळावा लागल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रचारबंदीविरुद्ध सर्व विरोधक एकवटले असून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. मंगळवारी कोलकाता येथे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोवेळी मोठा हिंसाचार भडकला होता. या हिंसाचाराची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने कलम 324 चा वापर केला.
लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी आहे. याचा प्रचार सायंकाळी पाच वाजता संपला. मात्र, पश्चिम बंगालमधील नऊ मतदारसंघांतील प्रचार 19 तास आधीच गुरुवारी समाप्त करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. त्यानुसार काल प्रचार संपला. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वृत्तवाहिन्यांद्वारे प्रचार करण्यासही आयोगाने बंदी घातली आहे.यानिमित्ताने विरोधक एकवटले होते.
ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडल्याचा आरोप नरेंद्र मोदी करत आहेत पण ते आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर 100 उठाबशा काढतील का? त्यांनी उठाबशा काढल्या नाहीत तर त्यांना तुरुंगात धाडेन, अशी धमकी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी यांना दिली. तृणमूल कॉंग्रेसमुळे या ठिकाणची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याचा आरोप भाजप नेते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. मात्र चंद्राबाबू नायडू, अखिलेश यादव, मायावती यांनी निवडणूक आयोगाला दोष दिला आहे.