नागपूर : नागपूरात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावाला आवरताना १२ ते १४ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर २ ते ३ नागरिकही जखमी झाले आहेत. या हिंसाचारामागील ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान या घटनेनंतर शहरात शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केले आहे. तसेच नागपूरची परिस्थित सध्या नियंत्रणात आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.तसेच आम्ही घटनेमागील कारण शोधून काढू. आतापर्यंत ४७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे. ते मुंबईत विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलत होते.
योगेश कदम म्हणाले, सोमवारी रात्री साडेबारा-दीड वाजताच्या सुमारास पोलीस प्रशासनाने नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. नागपूरच्या काही झोनमध्ये कलम १४४ (कर्फ्यू) आपण लावला आहे. काही ठिकाणी गाड्यांचे, दुकानांचे, घरांचे नुकसान झाले आहे. लोक काही घरांमध्ये घुसले होते. अशा गंभीर बाबतीत कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली.
पुढे म्हणाले, सकाळच्या वेळी एक आंदोलन झाले, कुठलाही वादविवाद न होता दुपारी काही जण पोलीस स्थानकात जमा झाले होते, त्यांचे पोलीस आयुक्तांशी बोलणं झाले, वाद तेव्हाच मिटला होता. दुपारी चार-पाच तासांनंतर काही जणांनी प्लॅनिंग केले असावे, असा अंदाज आहे, मात्र खात्रीशीररित्या सांगता येणार नाही. घर आणि गाड्यांवर हल्ले करण्यात आले, याचे कुठून आणि कोणी प्लॅनिंग केले, याची चौकशी करण्यात येईल, असेही योगेश कदम यांनी सांगितले.
रात्री उशिरापर्यंत स्थिती तणावपूर्ण : रवींद्र सिंगल
नागपुरातील महाल परिसरात दोन गट आमने सामने आल्याने हिंसाचाराला सुरूवात झाली. यावेळी मनपा, अग्निशमन विभागाचे १० ते १५ जवान जखमी झाले आहेत. अतिशय अरुंद अशा गल्लीबोळांचा हा महाल, भालदारपुरा, चिटणीस पार्कचा परिसर वर्दळीचा आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही, कंट्रोल रुमच्या माध्यमातून दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेणे सुरू केले आहे. काल दिवसभर या भागात आंदोलन, प्रति आंदोलन सुरू होते. रात्री उशिरापर्यंत स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याची माहिती पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
#WATCH | Mumbai | On Nagpur violence, Maharashtra MoS Home Yogesh Kadam says, “The reason behind the violence has not been found yet. 47 people have been detained so far. 12-14 police personnel were injured in the incident. 2-3 civilians also received injuries. We will find the… pic.twitter.com/Kkp9a2gpjT
— ANI (@ANI) March 18, 2025