दक्षिण कोकणातील नागपंचमी -नागपूजा व त्या परंपरेचा या लेखातून शोथ घेऊया…श्री शिव हे तत्त्व विश्वाच्या ज्या तीन अवस्थापैकी सृष्टी – स्थिती व त्यानंतरच्या ‘प्रलय’ या तत्वाचे प्रतिक म्हणून परिचित आहे. ब्रह्मा -विष्णू -महेश…पैकी महेश हा ‘शिव’ होण्यापूर्वी ‘रुद्र’होता. हे आपण सर्व जाणतोच.यजुर्वेदातील ‘रुद्राध्याया’त -मृग न भीमपमुहन्तुमुग्रम’ म्हणजे त्याला ‘ झडप घालून ठार मारणा-या सिंहाची उपमा दिली आहे. असे पं.महादेवशास्री जोशी यांनी आपल्या ‘गाजती दैवते’ या ग्रंथात नोंदवले आहे.
वैदिक काळात अनेक ऋषिनी या उग्ररूपाची प्रार्थना केलेली आढळते. ही प्रार्थना करण्याची आज आली आहे का. ??? भारतीय शिल्पकारानी ‘शिव’ मूर्तीरूपात जसा पाहिला तसा तो उत्पत्तीचे प्रतिक म्हणून महालिंग रुपातही पाहिला व लोकांनी पूजला.आपला केला. आपल्या कोकणातील मंदिरात प्रामुख्याने तो ‘स्वयंभू लिंग’ म्हणून गेली शेकडो वर्षे पूजला जातोय. अगदी मनापासून.. ! विशेष म्हणजे या शिवाइतकाच शिवाचा गोतावळाही लोक पुजू लागले, शिवाचे आयुध म्हणून ‘त्रिशूळ’ तर वाहन म्हणून ‘नंदी’ आणि त्यांच्या मानेभोवती असलेला सदा फणा काढून ‘तत्पर’असलेला नाग..! नागोबा…!
दक्षिण भारतात साधारणपणे पल्लव राजांच्या काळानंतर म्हणजेच इ.सनाच्या पाचव्या शतकापासून शिवाच्या पाषाणमूर्ती विविध रूपात निर्माण झाल्या असे अभ्यासक म्हणतात. हे येथे नोंदवणे आवश्यक आहे. कोकणात श्रावणात सोमवारी शिवपूजेप्रमाणेच ‘नागपंचमी’ या दिवसाला लोकपरंपरेत अनेक अर्थाने महत्त्व आहे. या शोधलेखात दक्षिण कोकणातील या नागपंचमी सणाचा नि लोकमानसाचा मी शोध घेत आहे. अर्थात माझ्यासोबत आपण सर्व अहातच… ! त्यापूर्वी मला श्रीशंकराचे एक अप्रतिम वर्णन लिहिण्याचा मोह आवरत नाही. हा शंकर आहे कसा…. ? तर
–गले नीलं भाले धृतविघुकलंमौलिजटिलं ।
महाभूषाव्यालं हतकलिमलंवहृदिनिटिलम् ।
शिरःखेलग्दङगं भसितकलिताङग सुरुचिरं।
मृडानिवामाङं किमपि सुखधामावतु चिरम् । । २ । ।
अर्थात —
“ज्याच्या कंठप्रदेशी नीलवर्ण, भालप्रदेशी चंद्रकला, ललाटस्थानी तृतीयनेत्रस्य अग्नि,मस्तकावर जटाभार व भागिरथी,सर्व शरीरावयांवर सर्प-भूषणे व भस्माचा लेप आणि वामांगी गिरिजा शोभत आहे ते कलिमलनाशक,आनंददायक व अनिर्वचनीय तेज-शंकर-माझे रक्षण करो.. ! आजच्या पाश्वभूमीवर हा प्रलंयकारी महादेव आनंददायक आणि अनीर्वचनीय तेज आहे; असे जे’श्रीमदानन्द मूर्तिचरितम्’ या ग्रंथात पुरुषोत्तमशास्री रानडे म्हणतात ते किती उपकारक आहे पहा. (प्रका. १९३०) आता शिवकंठावर विराजमान असलेल्या त्या नागराजांकडे वळूया..! कृषिसंस्कृतील लोकमानसाने या आपल्या शेतात रक्षण करणा-या नागोबाची चक्क वारुळरुपात प्रथम पूजा केली. ‘आयत्या बीळात नागोबा.’अर्थात हे बीळ शेतात शक्यतो वारुळात असते ; म्हणूनच लोककन्या म्हणते-
चल ग सये चल ग सये वारुळाला… नागोबाला पूजायला..
चल ग सये वारूळाला नागोबा ला पुजायला
हळद कुंकू वहायला!ताज्या लाह्या वेचायला ।।।
जमुनिया साया जणी।।जाऊ बाई न्हवणा ।।
जिथं पाय ठेवू बाई।तिथं उठलं वणवा ।।
तर दुसऱ्या एका लोकगीतात..
नागपंचमीला।उगाळा चंदनाचे गंध ।
तुटती भावबंध।पूजणार्याचे ।।
नागपंचमीला।नागाला घाला दूध।
होईल बुध्दी शुध्द ।नागकृपे।।नागपंचमी ।
नको चिरु भाजीपाला ।।दया शिकवू हाताला।
आज सये।। या मौखिक परंपरेने नागपंचमी
च्या निमित्ताने घरकामातून मोकळिक मिळणाऱ्या सया-बाया एकत्र येतात..नि चारघटका रोजचे कष्ट विसरतात.आपले मन मोकळे करतात. ‘जिथे पाय ठेवू तेथे उठलं वणवा ! ‘या एका उद्गारातून भल्या भल्याची झोप उडेल असे समर्थ उद्-गार बाहेर पडतात तेव्हा आपणही विचार करू लागतो. भारतीय संस्कृतीत मौखिक परंपरेत ‘स्त्री’मन प्रटकले ते हे असे. .!
पुढे वारुळाच्या पूजेबरोबर नागपूजा हळूहळू घरात ”अस्तमी’च्या म्हणजे मावळतीकडे त्याचे तोंड करुन होऊ लागली आणि तीही चक्क आपण जेवण तयार करतो त्या मातीच्या चुली शेजारी.. ! यामागील ‘रूढ ‘शोधण्याचा मी भरपूर प्रयत्न केला ; पदरात निराशा आली, पण शोधकाने आपले यत्न चालूच ठेवावे असे सत्यवचनच आहे..प्रयत्नांती परमेश्वर..! या शोधयात्रेच अचानक वाळपई येथे वैद्यकीय सेवा करणा-या डाॕ. अनुजा जोशी आपल्याकडे आलेल्या स्त्री रूग्णांना सहजपणे विचारु लागल्या आणि त्यांना ‘चुली लागी पूजणारो नागोबा छायाचित्ररुपात ‘मिळाली. तर दुसरीकडे मालवणी लेखिका व कोरोनो काळात आपल्या एका लेखाने ‘गाववाले नि चाकरीवाले’ हा वाद मोडित काढणा-या रुपाली दळवी-नाईक यानी यामागची कथा अनेकांना जंग जंग पछाडून शोधली.. ! तेव्हाच माझ्या लक्षात आले आपण सुरवातीलाच म्हटले होते ते शब्दशः खरे ठरले. ही दक्षिण कोकणची अध्यात्मिक रहस्य शोधयात्रा आता एकाकी नाही..!
अर्थात नागपंचमीला नागोबाची पूजा स्वयांपाकघरात थेट चुलीकडे का.? यापूर्वी नागपंचमीच्या पूजेच्या लोककथांकडे नजर टाकूया.. ! भारतीय पातळीवर ‘नागपंचमी ‘ हा सण म्हणून महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश आणि बंगाल येथेही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला ‘नागपंचमी'(नागपचम) असे म्हटले जाते. दक्षिण कोकणात या दिवशी मातीच्या नागाची मूर्ती घरोघरी , अगदी प्रत्येक घरात पूजली जाते. पूर्वी वळईत एका कोपऱ्यात भींतीवर नागाचे चित्र काढून ते पूजण्याची पद्धत होती. नंतर त्या चित्राखाली पाटावर नागपूजा सुरू झाली. या दिवशी काही रुढीप्रथा जपल्या जातात, पण याचा अभ्यास फारसा झालेला नाही. उदाहरणार्थ काही ठिकाणी या दिवशी भाजी ‘चिरत’ नाहीत पदार्थ ‘तळत’ नाहीस मातीला ‘दुखवत’ नाहीत . चुलीवर ‘तवा’ ठेवत नाही या संदर्भात गावागावात लोककथा ऐकवल्या जातात. कृषिजीवनाचा तो एक भागच होता.
नाग पूजेत नागोबाला लाह्या ,गुळ आणि दुध नैवेद्य म्हणून दाखवला जातो. कोकणात पूर्वीपासून घरोघरी दुपारी हळदीच्या पानात गुंडाळलेल्या तांदळाच्या पिठाच्या उकडीच्या ‘पातोळ्या’ करण्याची पद्धत आजही आहे. काही ठिकाणी दुपारी -संध्याकाळी वारूळाला जाऊन पूजा केली जाते. मुली आणि स्रीया फेर धरून गाणी म्हणतात. फुगड्या खेळत घरात दारात किंवा गावातील चौकात तात्पुरते झोपाळे बांधून झोके घेतले जातात. एक अपूर्व आनंदाचा हा दिवस आता काही ठिकाणी उपचार म्हणून उरला आहे. नव्या पिढीच्या आनंद साजरा करण्याच्या पद्धतीच बदलल्या त्यांना आता हे प्रकार जुनाट नि गावंढळ वाटतात. दुर्दैवाने वडिलधारी मंडळीही यावर अवाक्षर काढत नाहीत. त्याना काही बोलताच येत नाही.
आजही काही ठिकाणी जीवंत साप म्हणजे ‘नाग’ गावोगाव घेऊन गारूडी फिरवतात. लहानमुलांच्या मनातील भीती काही प्रमाणात दूर होते. याचकाळात दर शुक्रवारी स्रिया जिवतीची पूजा करतात. अलिकडे छापील नाग नरसोबाची चित्रे मिळतात; या नागनरसोबाची पूजादर शनिवारी केली जाते.पुढे गणेश चतुर्थीनंतर अनंतचतुर्दशीला दर्भाचा नागोबा तयार करून त्यांचीही पूजा केली जाते. कोकणात नागपंचमी दिवशी संध्याकाळी नागोबाचे विसर्जन करून ‘अळू’च्या खाली ठेवले जाते. एखाद्या छत्रीप्रमाणे मातीचा हा नाग रात्रभर राहिला तरी ती मूर्ती सुरक्षित रहाते. लहानमुले या नागमूती पुन्हा दुसऱ्या दिवशी घरात आणतात. काही ठिकाणी नागोबा गणपतीकडे आवर्जून ठेवण्याची पद्धत आहे.
नागोबाचा नेवैद्य
या विषयी एक रुढी मला संजय गावडे (माजगाव -सावंतवाडी) यांनी सांगितली ती अशी-” कोकणात काही ठिकाणी पाटावर अळूचेपान पाटावर नागोबाचे आसन म्हणून ठेवतात आणि खास केळीच्या पानाचा द्रोण करुन घरातच मातीच्या कुंडल्यात (भांडे) बनवलेल्या भाताच्या लाह्या नागोबाला नैवेद्य म्हणून अर्पण करतात.विशेष म्हणजे हा नैवेद्य गणेश चतुर्थीपर्यन्त जपून ठेवतात का. ..? तर गणेशचतुर्थीला चंद्र पाहू नये अशी लोकसमजुत कोकणात आहे. चुकून कोणी या दिवशी चंद्र पाहिला वा दृष्टीला पडला तर त्याला हा नागपंचमीला केळीच्या द्रोणात शिल्लक ठेवलेला प्रसाद द्यायचा या प्रथेमागे असलेले कारण शोधणेसुद्धा लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचा अभ्यासघटक होऊ शकतो. येवढी व्याप्ती या विषयाची आहे. आपण गेल्या पाच पन्नास वर्षात भलत्याच दिशेने धावतो आहोत.
ग्रामीण -कृषी संस्कृती व त्यातील प्रथा रुढी परंपराना तुच्छ लेखल्याने व अंधानुरणाच्या ओढीने आपण काय मिळवले ? त्यापेक्षा काय गमावले यांचे याकाळात प्रत्येकाने चिंतन व चिंता करावी असा काळ आपल्या समोर मोठ्ठा जबडा पसरून टपला आहे. तेव्हा आता तरी आपण सावध होऊ नि पिज्झा बर्गर ऐवजी आपलं चुलीवरचे पिढलं शोधू. या काळाने शिकवलेला धडा आहे असे कुणाला वाटले तर व्यर्थ टिका करण्यात अर्थ नाही असा निष्कर्ष आपल्याला काढावा लागेल
नागपंचमी व्रतकथा-
लोकमानसात नागपंचमी संदर्भातील दोन लोककथा पूर्वी सर्वज्ञात होत्या, एक सूनबाईची आणि दुसरी शेतकऱ्यांच्या संदर्भातील. या दोन लोककथा-कहाण्या मी काही जणांना या शोधयात्रेत विचारल्या; पण या विषयी माझा पुरता भ्रमनिरास झाला. विचारलेल्या पैकी एक दोन स्रिया अपवाद होत्या…पण त्याना अशा कथा आहेत, होत्या एवढेच माहित होते. दोष नव्या पिढिचा अजिबात नाही, कारण त्या कथा त्यांच्यापर्यन्त कोणी आणल्याच नाहीत तर त्यांना समजणार तरी कशा… ?
कहाणी नागपंचमीची
ही लोक कहाणी अशी- ऐका नागोबा देवा. तुमाची कहाणी. आटपाट नगर होते. तेथे एका घरात पाच-सात सुना होत्या. श्रावणातील नागपंचमीचा दिवस. सर्व सुना कुठे -कुठे गेलेल्या,मात्र धाकटी घरीच थांबलेली. तिला माहेरचे कोणीच नव्हते. झाली बिचारी खिन्न. मनात आले तिच्या नागोबा देव मला येईल माहेरहून न्यायला. इतक्यात काय झालं? शेषभगवाला तिची दया आली, करुणा दाटली. तो आपले रूप पालटून मुलीला नेण्यासाठी आला. तिच्या सास-याला वाटले हा इतके दिवस कुठे होता? आता कुठून आला.? सून म्हणाली हाच माझा मामा. रवानगीनंतर मामाने नेले वारुळात. खरी हकिगत सांगितली तिला. फण्यावर बसवून म्हणाला बायका मुलाना ‘हिला कुणी चावू नका … दिली ताकीद सर्वाना. पुढे एक दिवस नागीण बाळंत होते. तिला या मुलीला दिवा धरायला सांगते. वळवळणारी पिल्ले पाहून ती घाबरते. दिवा पडतो खाली. नागिण पिल्लांची शेपटं जळून जातात. नागीण रागावते. नवरा (नागोबा) म्हणतो, हिला सासरी सोडतो. नागीणबाई झाली खूष. भरपूर संपत्ती नि मनुष्य घेऊन नाग तिला पुन्हा सासरी आणतो. पुढे नागपोरे मोठी झाल्यावर विचारतात,’आई आमची शेपटं का तुटली.. ?
ती सारी खरी गोष्ट सांगते. त्याना येतो राग. तिचा सूड घ्यावा म्हणून येतात मुलीच्या घरी पण तो असतो दिवस नागपंचमीचा. वाट पाहून पाहून आपली नाग भावंडे आता येत नाहीत म्हणून ती भींतीवर नि पाटावर काढते चित्रे करते पूजा. समोर ठेवते दुध लाह्या. उकडीचा नेवेद्य दाखवते. (उकडीच्या पातोळ्या कोकणात का करतात ?या मागचे रहस्य सूज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच.) ही पूजा व नैवेद्य पिल्लं पहातात. पूजे शेवटी माझ्या नागभांवडांना सुखी ठेव. आनंदी ठेव अशी प्रार्थना ऐकून सर्व राग निघून जातो. बहिणीविषयी दया.. प्रेम उफाळून येते. वस्ती करतात. मात्र जाताना देतात नवरत्नाचा एक हार.. ! नागोबा होतो प्रसन्न तसा ही पूजा करेल त्यालाही होईल प्रसन्न . अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपन्न होताना सांगते. ही कहाणी लोकमानसाने का तयार केली..? का तिला एक ‘भाकडकथा’म्हणून हिणवण्यात धन्यता मानणार.? या प्रश्नांची उत्तरे ज्यांने त्यांने शोधायची आहेत महाराजा.. !
कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची
लोकमानसाने जपून ठेवलेली दुसरी कथा आता वाचुया. आटपाट नगरीत एक शेतकरी रहात होता. त्याच्या शेतात होते नागाचे वारूळ.श्रावणात नेहमीप्रमाणे नांगर घेऊन तो शेतात गेला. नांगरत असताना नांगरांचे फाळ मातीत असलेल्या नागिणीच्या पिल्लाना लागते आणि पिल्ले मरतात. काहीवेळाने तेथे नागीण येते. वारूळ शोधते, तर शेतात वारुळ नसते. ते नांगरले जाते नि त्यात तिची पिल्लेपण मरतात. तेवढयात तिला नांगराच्या फाळाला रक्त दिसते. तिच्या मनात येते -” या नांगराने आपली पिल्ले मारली.”
तिच्या मनात सूड निर्माण होतो. ती थेट शैतक-याचे घर गाठते. घरातील सर्वांना दंश करते, मात्र परगावी असणारी शैतक-याची एक मुलगी वाचते. तिला पण मारून टाकावे म्हणून ती त्या गावी जाते पण…! तेथे गेल्यावर ती मुलगी नागाची पूजा करत असते.दुध, लाह्या, दुर्वा वाहत असते..ही पूजा पाहून चिडलेली नागीण संतुष्ट होते, ती मुलगी सर्व हकिगत कथन करते. तेव्हा नागीणीला वाटते,’अरे ही तर आपली भक्ती करतेय नि आपण हिच्या माहेरच्या सर्वाना मारले. मुलगी आपले माहेरचे जिवंत कसे होतील? असा प्रश्न विचारते. त्यावर नागीण तिला अमृत देते, ते घेऊन ती माहेरी येते नि सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत टाकते. सगळे जिवंत होतात. आपल्या शेतकरी वडिलांना ती सर्व घडलेले सांगते. नागपूजा कशी करावी हे सांगते. नागपंंचमीला जमीन खणू नये असे सांगते. कळत- नकळत मातीतील जीवजंतूची हत्या होते. तेव्हापासून शेतकरी नागपंचमीला शेतात जात नाही. नांगरणी करत नाही.
आता शेवटी कोकणातील हा नागोबा स्रिला कसा पावतो ? पहा. वर्षभर कदाचित दोन- तीन वर्षेही मुंबईकर नव-याची आतुरतेने वाट पहाणारी ‘माघारीण’या वर्षी नागोबाला नवस करते नि गणपतीत तिचा धनी गावी येतो. आपल्या फुगडीगीतात अत्यानंदाने ती म्हणते,
नागोबा राया पावलो गे बाय
औनूच्या वर्सलिक येता गे बाय
घोवाक रजा गावली गे बाय
लुगडीचोळींन मी फुल्लय गे बाय
चोळी माझी गे तराटली गे बाय
घोवाक उपरती झाली गे बाय । ।
या एका फुगडीगीतांने त्या माऊलींला किती हृदयातून फुलवले आहे…, पहा- तिचा नागोबा. .. तिला पावतो नि गणोबा (गणपती)च्या निमित्ताने तो (नवरा)गावी येतो. ती नखशिखान्त फुलून येते .. आपल्यातील मानसिक- शारिरिक झालेला बदल ती किती संयमित शब्दांतून व्यक्त करते पहा… ! किती सामर्थ्य लपले आहे पहा. वाचकहो आपण या विषयाकडे किती दुर्लक्ष केले आहे पहा. वरवर हे नागपंचमीच्या फुगडीचे गीत एक मनोगत वाटेल, पण नागोबाला तिने केलेल्या नवसाला ( की मनशक्तीचे सामर्थ्य) तो पावला. हे तिचे हृदयगत प्रत्यक्षात पूर्ण झाले
टीप – १. या लेखनात मौखिक संदर्भात नाग (साप)दुध पितो असा उल्लेख आलेला आहे ,मात्र नवे संशोधन सांगते की, नाग दुध किंवा लाह्या खात नाही. हे संदर्भ ग्रामीण शेतकऱ्यांकडे हे पदार्थ सहजपणे उपलब्ध असतात म्हणून लोककहाणी व लोकगीतात आलेले आहेत.
संदर्भ – १)गाजती दैवते,पं. महादेवशास्री जोशी,अनमोल प्रका.पुणे, १९९५.
२)संपूर्ण चातुर्मास, का. अ. जोशी. (धार्मिक प्रका. संस्था ,मुंबई ) न.आ. २०१६.
प्रा. डाॕ. बाळकृष्ण लळीत