श्रीगोंदा : चांगले काम करणाऱ्या अनेकांचा श्रीगोंदेकरांनी कार्यक्रम केला आहे. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आला. निवडणुकीत काहींनी सोबत राहून माझा घात केला, त्यांची यादी तयार ठेवली आहे. भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये त्या सगळ्यांचा हिशोब चुकता करू, असा इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
तालुक्यातील कोरेगाव येथे गोविंदबन वॉटरपार्कचे उद्घाटन विखे पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी रमेश गिरमकर, पुरषोत्तम लगड, बाळासाहेब गिरमकर, पाचपुते मामा, सिद्धेश्वर देशमुख, दत्तात्रय रणसिंग, रामदास झेंडे, बाळासाहेब भोवले, राजेंद्र इंगवले, बिभीषण पवार, नितीन साबळे, बापूतात्या गोरे, अशोक खेडके, संग्राम घोडके,अंबादास औटी, संजय खेतमाळीस उपस्थित होते.
माझा संपर्क तालुक्यातील पुढाऱ्यांसोबत राहिल्याने माझे वाटोळे झाले. आपण ही चूक सुधारून थेट जनतेशी कनेक्टिव्हिटी वाढविणार आहे. खासदारकी नसल्याने मला फरक पडत नाही, मात्र एक चूक तालुक्याला मागे नेणार आहे, याचा विचार कोणी केला नाही, असा टोलाही विखे यांनी लगावला.
पाणीप्रश्नावर बोलताना सुजय विखे म्हणाले, तालुक्यात पाण्यासाठी मोठा संघर्ष आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी पाणी आरक्षित केले आहे. मात्र, त्यासाठी कोणाच्याही पाण्याला धक्का लावलेला नाही. साकळाईचा ४९५ कोटींचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे गेला आहे. महिनाभरात मान्यता मिळून येत्या तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया व भूमिपूजन करण्याची जबाबदारी माझी आहे.
कुकडीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी डिंभे ते माणिकडोह बोगदा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच कार्यकाळात पूर्ण होईल, असेही विखे यांनी सांगत राजकीय टोलेबाजी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सावळे यांनी केले,स्वागत वसंतराव मोहारे यांनी तर आभार दादासाहेब साबळे यांनी मानले.
आ.विक्रम पाचपुते यांची अनुपस्थिती अन् विखेंची राजकीय टोलेबाजी
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर येत राजकीय टोलेबाजी करत तालुक्यातील पुढाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. त्याचवेळी भाजपचे आ.विक्रम पाचपुते यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवत अनुपस्थिती दर्शविल्याने तसेच माजी खा.सुजय विखे यांनी केलेल्या राजकीय टोलबाजीने कार्यक्रम स्थळी कुजबूज सुरू असल्याचे पाहायला मिळाले.