हितेंद्र मल्होत्रा ः 45 मिनिटांनी कमी होणार प्रवासाची वेळ
नगर – रेल्वेने नगर ते पुणे प्रवास काही मिनिटांवर आणण्यासाठी लवकरच कॉड लाइनचे काम पूर्ण होत असल्याचे विभागीय रेल्वे अधिकारी हितेंद्र मल्होत्रा यांनी सोलापूर येथे झालेल्या रेल्वे विभागीय सल्लागार सदस्यांच्या बैठकीत जाहीर केले. कॉड लाइनचे काम झाल्यानंतर अहमदनगर रेल्वे स्टेशनसाठी टर्मिनल सुविधेचा विचार करण्यात येणार असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले.
रेल्वे विभागीय सल्लागार सदस्यांच्या बैठकीत उपस्थित असलेले रेल्वे सल्लागार समिती सदस्य तथा उद्योजक हरजितसिंह वधवा यांनी माहिती दिली. तर प्रवासी संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येत्या महिन्यात कॉड लाइनचे काम पूर्ण होत असून, नगर-पुणे रेल्वे मार्गाने हे अंतर सुमारे 45 मिनिटांनी कमी होणार आहे. नगर मधून जाणाऱ्या सुमारे 30 रेल्वे गाड्या दौंड येथे इंजन बदलण्यासाठी अर्धा-अर्धा तास थांबत असत. या कॉड लाइनमुळे हा वेळ वाचणार आहे. अनेक दिवसांपासून नगरकरांची ही मागणी होती. यासाठी प्रवासी संघटनेच्या वतीने पाठपुरावा केला असता त्याला यश आले असल्याचे वधवा यांनी सांगितले.
हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या वतीने हरजितसिंह वधवा, अशोक कानडे, विपुल शाह, संजय सपकाळ, अजय दिघे, संतोष बडे, संजय वाळुंज, प्रशांत मुनोत, विपुल शहा, एस. बी. रुणवाल, सुनील छाजेड, मिलिंद बेंडाळे, धनेश कोठारी, अजित चाबुकस्वार, विश्वनाथ पोंदे, श्रीपाद शहाणे आदींसह राजकीय पुढाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. यासाठी रेल्वे अधिकारी आर. के. गांधी, पुरकर यांचे सहकार्य लाभले.