आमदार जगदीश मुळीक यांचा दावा
पुणे – नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पहिल्यांदाच एकात्मिक वाहतूक विकास आराखडा करण्यात आला आहे. या माध्यमातून चार उड्डाणपूल आणि कल्याणीनगर नदीपुलाचे विस्तारीकरण अशी कामे हाती घेतल्याने वाहतूक कोंडी सुटणार असल्याचा दावा वडगावशेरीचे आमदार जगदीश मुळीक यांनी केला आहे.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी महायुतीमधील घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मुळीक म्हणाले, “गोल्फ चौक, विमाननगर, खराडी बायपास आणि विश्रांतवाडी चौकातून दररोज साधारण 91 हजार दुचाकी, 49 हजार चारचाकी आणि 7 हजार 300 ट्रक वाहतूक करतात. ही बाब लक्षात घेऊन येथे चार उड्डाणपूल करण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात 92 कोटी, कल्याणीनगर नदीवरील पुलाचे विस्तारीकरणासाठी 15 कोटी, येरवडा गोल्फ चौकासाठी 20 कोटी, खराडी उड्डाणपुलासाठी 15 कोटी, येरवडा- शास्त्रीनगरसाठी 20 कोटी आणि विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील गोल्फ चौकाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
खराडी-शिवणे रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील खराडी ते संगमवाडी या रस्त्याचे फक्त एक कि.मी. काम बाकी आहे. हा रस्ता लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे. अनेक वर्षे हे काम कागदावरच होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत या कामाला गती आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आज अर्ज दाखल करणार
आमदार जगदीश मुळीक हे वडगावशेरी मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. गुरुवारी सकाळी 9 वाजता कल्याणीनगर मुळीक पॅलेस येथून ते फेरी काढून शक्ती प्रदर्शन करत येरवडा क्षेत्रीय कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.