-कबीर बोबडे
नगर – सामाजिक दायित्व म्हणून अनेक जिल्ह्यात माणुसकीची भिंत ही लोकचळवळ सुरू झाली. नगर शहरात देखील ही चळवळ सक्रिय झाली होती. नको असेल ते द्या, हवे ते घेऊन जा. या ब्रीदवाक्यानुसार ही चळवळ काम करते. या चळवळीची गरजू लोकांना चांगलीच मदत झाली, पण आता काही लोकांनी चक्क फाटलेले कपडे येथे आणून टाकण्यास सुरुवात केली. दुसऱ्याला उपयोगात येतील अशा वस्तू ऐवजी या ठिकाणी अडगळीचं साहित्य टाकल्या जातं.
सुरुवातीच्या काळात नागरिकांनी आपल्याला नको असलेले कपडे, पण चांगले कपडे, चादर, चपला, घरघुती वस्तू, औषधे यासह अन्य काही वस्तू या भिंतीवर आणून दिल्या, आणि ज्या लोकांना या वस्तूची गरज आहे त्यांनी ह्या वस्तू घेऊन जाऊ लागले. पण, अल्पावधीतच या चळवळीकडे दातृत्व करणाऱ्या लोकांनी पाठ फिरवली. आता या माणुसकीच्या भिंतीपाशी फक्त फाटक्या कपड्यांचा ढीग पहावयास मिळतो.
शहरात हा उपक्रम पोलीस प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आला. शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन, तोफखाना पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालय येथे माणुसकीची भिंत उपक्रम राबवण्यात आला.
कोतवाली पोलीस स्टेशन आणि तोफखाना येथील भिंती केवळ शोभेच्या वस्तू राहिल्या. कोतवाली पोलीस स्टेशन येथील माणुसकीच्या भिंतीवर केवळ दोन शर्ट दिसून येतात. तर पोलीस अधीक्षक कार्यालय येथील माणुसकीची भिंत नागरिकांनी कचरा आणून टाकण्याचा ठिकाण केलं. येथे घरातल्या अनावश्यक वस्तू, अडगळीतल सामान टाकल्या जातं. घरातलं अडगळीतल सामान आणून देण्याची जागा, असा माणुसकीच्या भिंतीचा चुकीचा अर्थ घेतला जातो.
माळीवाडा येथील माणुसकीची भिंती समोर दुचाकी पार्किंग केल्या जातात. येथील माणुसकीची भिंतीवर नागरिक लघुशंका करताना दिसतात. पोलीस प्रशासन आणि शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचे याकडे पूर्णत दुर्लक्ष आहे.