मनसेचे पदाधिकारी नितीन भुतारे यांनी उडविली खिल्ली
शिवसेनेतील अंतर्गत वाद नगरच्या विकासासाठी धोकादायक असल्याची टीका
नगर- नगरमधील रस्त्यांवरील खड्डे हा एक मोठाच त्रासदायक विषय आहे. तथापि, या विषयावर महापालिकेतील सत्ताधारी शिवसैनिकच आंदोलन करत असतील तर हे हास्यास्पद आहे. त्याची तातडीने दखल घेऊन शिवसेना नेत्या, महापौर रोहिणी शेंडगे यांनीच राजीनामा द्यायला हवा, अशी खिल्ली मनसेचे पदाधिकारी नितीन भुतारे यांनी उडविली आहे.
शहारातील खराब रस्त्यांवर आता पायी चालणे सुद्धा अत्यंत धोक्याचे झालेले आहे. मात्र, ज्यांच्यावर नगरकरांनी आता शहराची जबाबदारी दिली, असे सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवक तसेच पदाधिकारी खड्डे बुजविण्याबाबत आयुक्तांना घेराव घालत आहेत. आयुक्तांना आंदोलनाचा इशारा देत आहेत, महापालिकेच्या इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा देत आहेत. “न भूतो न भविष्यती’ असे आंदोलन करण्याचा इशारा देत आहे. हे कुठेतरी शिवसेनेतील अंतर्गत वादातून होत आहे.
अशाप्रकारे सत्ताधारी म्हणून शिवसेनेने काम न करता अंतर्गत गटबाजीमुळे एक गट सत्तेच्या विरोधात आंदोलन करणार असेल व एक गट फक्त बघ्याची भुमिका घेणार असेल, तर येणाऱ्या काळात शहर विकासासाठी ही धोक्याची घंटाच आहे. नगरकरांनी सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचे निवडून दिले.
शिवसेनेचे नगरसेवक निवडून दिल्यानंतर सत्ताधारी म्हणून नगरकरांनी शिवसेनेला स्वीकारल आणि सत्ताधारी स्वीकारल्यानंतर जर शिवसेनाच आंदोलनाचा इशारा देत असतील, तर शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांना महापौर पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राहत नाही. नगर शहरासाठी सर्व नगरसेवक तसेच सत्ताधारी महापौरांना शहर विकासाचे नियोजन जमत नसेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी टीका भुतारे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निधीची मागणी करावी. नगरविकामंत्री शिवसेनेचा असल्याने शहरातलील रस्त्यांना निधी आणता येईल. मात्र, महापौरांना तो निधी आणता येत नसेल, तर या पदावर बसून काय उपयोग? असा सवाल भुतारे यांनी केला आहे.