संगमनेर : तालुक्यातील जवळे कडलग ते वडगाव लांडगा रस्त्याच्या कामासाठीचा निधी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या कार्यकाळात मंजूर झालेला आहे. त्यासाठी पाठपुरावा आ.अमोल खताळ यांनी केला आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय इतरांनी घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, अशी टीका भाजपचे माजी उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी केली.
ज्या माजी जिल्हा परिषद सदस्यांनी आणि माजी पंचायत समिती सदस्याने पत्रक काढून जवळे कडलग- वडगाव लांडगा रस्त्याचे मोघम श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी त्यांच्या मालकीच्या कंपनीचे जवळे कडलग गावात चालू असलेले जलजीवन मिशनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे. जवळे कडलग गावातील अनेक रस्ते त्यांनी स्वतःच्या धंद्यासाठी फोडले आणि पुन्हा नीट पण केले नाही. तसेच गावातील जलजीवन मिशनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. गोरगरीब लोकांचे रस्ते कित्येक वर्ष दादागिरी करून बंद ठेवलेत. अशा लोकांनी रस्त्यावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नसल्याची टीका बापूसाहेब देशमुख यांनी केली.
निर्मिती कंट्रक्शने जवळे कडलग- धांदरफळ अतिशय निकृष्ट दर्जाच्या झालेल्या रस्त्याबद्दल पत्रक काढण्याची हिंमत करावी. ज्या रस्त्याला साइडपट्टी आणि साइड गटारीचे काम न करता पैसे खाल्ले, रस्त्याचे कार्पेट तर जणू इस्टीमेटमधेच नाही, असे दिसते. तसेच निर्मिती कंट्रक्शनच्या मालकाने उद्घाटन केलेले जवळे कडलग गावातील इतरही निकृष्ट रस्ते माजी आमदाराच्या लोकांनी केले. २ वर्षात त्या निकृष्ट रस्त्यांची काय परिस्थिती आहे, त्यावरती पहिले पत्रक काढा, असा सवाल देशमुखांनी उपस्थित केला. आपल्या साहेबांच्या ४० वर्षाच्या नाकर्त्यापणावर पण एखादे पत्रक काढण्याची हिंमत करावी, असे आव्हान दिले.
यांनी माजी आमदारांच्या जीवावर तालुक्यात दुकानदारी टाकली आणि त्या दुकानदारीतूनच त्यांचा पराभव झाला. त्यांनी आ अमोल खताळ यांच्यावर विनाकारण खोटे आरोप करून आपल्या नेत्यांना खुश करून आपली संपलेली दुकानदारी वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न हे पत्र काढून केला आहे. आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभव दिसत असल्या कारणाने हे लोक विकासकामांनी व्यथित झाले आहेत. तुमच्या नेत्याची दुकानदारी तर संपलीच आहे आता तुमची ही दुकानदारी संपण्याच्या मार्गावर आहे.
जर हा रस्ता माजी आमदारांनी मंजूर केला आहे, असे ते म्हणत असेल तर त्याचे काम पूर्ण करण्यास त्यांना मुहूर्त सापडत नव्हता का, अशा शब्दांत बापूसाहेब देशमुख यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यावर टीका केली. आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वात तालुक्यात जे विकास पर्व चालू झाले आहे, त्यामुळे माजी आमदार व त्यांचे बगलबच्चे व्यथित झाल्यासारखे वाटत आहे.