जामखेड : जांबवाडी शिवारात रस्त्यालगत असलेल्या विहिरीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने पन्नास फूट खोल विहिरीत बोलेरो गाडी पडून चौघा तरुणांचा मृत्यू झाला. मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिक विहिरीजवळ गोळा झाले. त्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केले. जामखेड नगरपरिषद हद्दीतील जांबवाडीजवळील मातकुळी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आज बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
जामखेड येथील अशोक विठ्ठल शेळके (वय 29, रा. जांबवाडी), रामहरी गंगाधर शेळके (वय 35, रा. जांबवाडी), किशोर मोहन पवार (वय 30 रा. जांबवाडी) व चक्रपाणी सुनील बारस्कर (वय 25 रा. राळेभात वस्ती) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे चार तरुण मातकुळीकडून जांबवाडी मार्गी जामखेडकडे येत होते. जांबवाडी जवळ रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पवनचक्की कंपनीची बोलेरो गाडी (एम एच. 23 ए. यु. 8485) पडल्याने एकच मोठा आवाज झाला. यामुळे जवळच रस्त्याचे खडीकरण काम सुरूअसल्याने तेथील मजूर घटनास्थळी धावले. चारही तरुणांना बाहेर काढले आणि ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण तत्पूर्वीच चौघांचाही मृत्यू झाला होता.अद्यापही बोलेरो गाडी विहिरीत आहे.
चक्रपाणी सुनील बारस्कर हा पवनचक्की कंपनीच्या गाडीवर चालक होता. पवनचक्की कंपनीचे काम बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तत्काळ घटनास्थळी आपली रुग्णवाहिका घेऊन धाव घेतली. तेथील जमलेल्या नागरिकांनी तथा पोलिसांनी अपघातग्रस्तांना विहिरीतून बाहेर काढून कोठारी यांच्या रुग्णवाहिकेत टाकून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती.
वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. चारपैकी दोघांचे लग्न झाले होते. त्यांना लहान मुले आहेत. तर दोघे अविवाहित होते.अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली.अधिक तपास जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील तपास करीत आहे.