शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली असून या मुलाखतीत त्यांनी ईव्हीएमबाबत भाष्य केले आहे. पवार म्हणतात, “मी ईव्हीएममध्ये फेरफार शक्य असल्याचे ऐकून आहे. ईव्हीएममध्ये एक चिप असते आणि ती चिप बाहेर नेऊन ईव्हीएममधील मतात फेरफार करता येऊ शकतो, असे मी ऐकून आहे. पण मला याबाबत ठोस माहिती नाही. मी याबाबतीतील तज्ज्ञदेखील नाही, पण माझ्याकडे याबाबत ठोस माहिती नाही.भाजपाचे नेते देशात यंदा अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागतील असा दावा करत आहेत. यात बारामतीचाही समावेश असेल, असे भाजपा नेते सांगतात. असे अनपेक्षित निकाल लागले तर लोकांचा मतदानावरील विश्वास उडेल आणि ते कोणत्याही टोकाला जातील. असे पवार म्हणाले होते.
बारामती मतदारसंघात पवार किंवा त्यांचा उमेदवार साडेतीन लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आल्याचे इतिहास सांगतो.पण गेल्या निवडणुकीत एक कार्यक्षम खासदार असलेल्या सुप्रिया ताईंचे मताधिक्य सत्तर हजारावर आले होते. मताधिक्याला महत्व नसून निवडून येणे महत्वाचे असल्याचे विधान त्यांना करावे लागले आहे.एवढेच नव्हे तर फॉर्म भरल्यावर मतदारसंघात फारसे लक्ष न देणारे पवार बारामतीत अनपेक्षित निकाल लागल्यास ईव्हीएमवर शंका घेत लोकांचा मतदान प्रक्रियेवरील विश्वास उडेल असा अजब तर्क मांडत आहेत.दोघांनाही हरण्याची भीती वाटत असावी असे लोकांना वाटू शकेल असे हे बोलणे आहे. सुप्रियाताईंचा मतदारसंघातील संपर्क,संसदेतील त्यांचे कार्य पहाता त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल असे खरे तर वाटत नाही.अर्थात 23 मेला खरे काय ते समोर येईलच.
बारामती आणि जवळपासच्या भागात पवार साहेबांना देव मानले जाते. सर्वच जातिधर्माच्या लोकांची साहेब काळजी घेतात. त्यामुळेच तेथील जनताही तेवढेच प्रेम करते. असे असूनही पवार साहेब मधून मधून अनाकलनीय वागतात. मागील विधानसभा निवडणुकीच्या काळात माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुंबईत मतदान करून बोटावरची शाई पुसून परत गावी जाऊन घड्याळाचे बटण दाबा असे गंमतीने म्हटल्याने साहेब गोत्यात आले होते. कोल्हापूरच्या संभाजी राजांना भाजपाने खासदार केल्यावर “पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे,आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात.” अशी जातीयवादी टिप्पणी फडणविसांवर त्यांनी केली होती.
पुणेरी पगडी हे विद्वत्तेचे प्रतीक समजले जाते. आगरकर, गोखले,टिळक असे अनेक विद्वान ही पगडी वापरत असत. शरद पवारांसहित हजारो लोकांचा सत्कार पुणेकरांनी ही पगडी घालून केला आहे त्यापैकी कुणीही ती कधी नाकारल्याचे ऐकिवात नाही. नावातच महात्मा असलेल्या फुलेंची पगडी भष्टाचाराच्या आरोपाखाली दोन वर्षांपेक्षा अधिक वर्ष तुरुंगात असलेल्या व जामिनावर असलेल्या केवळ ते फुल्यांच्या जातीचे आहेत म्हणून घालणे हा फुल्यांचा अपमान नाही का? शिवाय डोक्यावर घातलेली पुणेरी पगडी काढून त्याजागी दुसरी घालण्याची कृती एका जाहीर कार्यक्रमात करून पवार साहेबांनी काय मिळविले असेल? वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, केंद्रात संरक्षण आणि कृषिमंत्री अशी यशस्वी कारकीर्द असलेल्या पवारांना मोदी गुरुस्थानी मानतात.
जीएसटी लॉंचिंगच्या संसदेच्या सेन्ट्रल हॉलमधील ऐतिहासिक समारंभात पहील्या रांगेत अडवाणींशेजारी जागा देऊन मोदी सरकारने पवार साहेबांबद्दलचा आदर दाखवला होता.मुख्यमंत्री फडणवीस कठीण प्रसंगी पवार साहेबांचा सल्ला घेतात व मनापासून आदर दाखवतात. प्रचाराच्या सभेत एकमेकांचे वाभाडे काढणे ही राजकीय अपरिहार्यता आपण थोडा वेळ बाजूला ठेवुयात. खरे तर शरद पवार हे हवेचा रुख ओळखणारे चाणाक्ष नेते आहेत. माढा मतदारसंघातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील अंतर्गत लाथाळ्या, घरातील धुसफूस, माढा मतदारसंघाशी तुटलेला जनसंपर्क लक्षात घेऊन लढण्याचे जाहीर करूनही सुज्ञपणे माघार घेतली. मोहितेपाटील घराण्याने कॉंग्रेसशी घेतलेली फारकत आणि पार्थला दिलेली उमेदवारी बघता हे किती योग्य होते ते नंतर कळलेच. नुकतेच भाजपला बहुमत मिळणार नसल्याचे ‘भविष्य’ वर्तवितानाच शरद पवार यांनी पंतप्रधानपदासाठी ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू या स्पर्धेत असतील असे सांगत एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला.
महत्त्वाचे म्हणजे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे संभाव्य दावेदार नाहीत असे सूचित करून त्यांनी आपल्या राजकारणाची दिशाही स्पष्ट केली आहे. राहुलना थेट नाराज करणे परवडणारे नसल्याचे लक्षात आल्यावर आपल्या बोलण्याचा विपर्यास झाल्याचा खुलासा करून त्यांनी राजकीय चातुर्यही दाखवले.एकूणच मे नंतरचे राजकीय वातावरण कसे असेल, याबद्दलचे पवारांचे म्हणणे या निमित्ताने पुढे आले आहे. पवारांचे असे बोलणे हे एखाद्या मोठ्या योजनेचा भाग असतो हा इतिहास आहे. पवार साहेबांचे हे एक वेगळे वैशिष्ट्य असल्याने ते अधूनमधून अशी चकित करणारी विधाने करून जनमत अजमावत असतात. “सर्जिकल स्ट्राईक करण्यापूर्वी मोदींनी माझा सल्ला घेतला होता.’ असा अर्थ निघेल असे विधान करून अशीच सनसनाटी त्यांनी निर्माण केली होती. त्यांच्या समर्थकांना हे योग्य वाटत असले,तरी पवार आपली विश्वासार्हता दर वेळी पणाला का लावतात हा प्रश्न उरतोच.
निवडणूक निकालानंतर खरोखर हंग पार्लमेंट बनली व प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची वेळ आली तर पवार हाच सर्वमान्य पर्याय म्हणून पुढे येईल, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. खरे तर देवेगौडांसारखी पंतप्रधानपदाची लॉटरी शरद पवारांना लागली तर तमाम मराठी जनतेला अत्त्यानंदच होईल. आपले समर्थक वस्तुस्थितीपासून दूर असल्याची जाणीव पवार यांना असली तरीही मनाच्या एका कोपऱ्यात त्यांचेही अंकगणित सुरूच असावे. पण लढवत असलेल्या सर्व जागा जिंकल्या तरी पंतप्रधानपद शक्य नसल्याचे प्रांजळपणे ते स्पष्टही करतात.
खरे तर एव्हीएम टॅंपरिग ही एक राजकिय चर्चा आहे. या ईव्हीएमना बाहेरुन काहीही कनेक्टीव्हीटी नाही(इंटरनेट सारखी).शिवाय प्रत्येक एव्हीएममधे उमेदवारांची माहिती एक एक करून भरली जाते. त्यामुळे एका मतदारसंघात समजा ईव्हीएम मशीन असतील तर त्या प्रत्येक मशिनला स्वतंत्रपणे (कनेक्टीव्हीटी नसल्याने) टॅंपर करावे लागेल व असा प्रत्येक मशीनला पोलीस संरक्षण असताना ऍक्सेस मिळणे कसे शक्य आहे.एका मतदारसंघात ही स्थिती, तर सर्व मतदारसंघात हे होणे कसे शक्य आहे? निवडणूक आयोगाने पर्याप्त वेळ देऊनही देशातील कुठलाही पक्ष ईव्हीएम मशीन टॅंपर करायला का पुढे आला नाही याचे खरे कारण हेच असावे. सर्वच विरोधकांप्रमाणे ईव्हीएमवर शंका उपस्थित करत शरद पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे.पवार पराभूत मानसिकतेतून असे बोलत असून, पराभवाआधी कारणे तयार ठेवत असल्याचा पलटवार महाजन यांनी केला आहे. ते बारामतीत जिंकले तर लोकशाही जिवंत,अन् आम्ही जिंकलो,तर लोकशाही धोक्यात,याला काही अर्थ नसल्याचेही महाजन म्हणाले. इव्हीएममध्ये छेडछाड करता आली असती,तर आम्ही चार राज्यात हरलो नसतो. कॉंग्रेसने जिंकलेल्या राज्यात त्यांनी मशीनमध्ये छेडछाड केली असे आम्ही म्हटले नाही,असेही महाजन म्हणाले.अर्थात पवार साहेबांनी सध्यातरी महाराष्ट्रातील दुष्काळावर लक्ष द्यायचे जाहीर केले असून त्यांच्या मनात नक्की काय आहे हे लोकसभा निवडणुकीच्या निकलांतरच समोर येईल.