पुणे – “आज मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली असती, तर मंत्र्यांना जाग आली असती ना? दुसऱ्याचा जीवाचा विचार करा..त्याच्या आई-वडिलांचा विचार करा ना.. त्यांच्यावर काय परिस्थिती आहे? आमची परिस्थिती आम्हांला माहिती.. आम्ही त्याला कसं शिकवलं..तो किती हुशार होता.. म्हणून त्याला तिथपर्यंत पोहोचवलं.. आणि तिथपर्यंत पोहोचण्याआधीच सरकारनं अशी मुलं आत्महत्येकडे प्रवृत्त करावीत का?’, असा सवाल स्वप्नीलच्या आई छाया यांनी उपस्थित केला आहे.
स्पर्धा परीक्षेचा टप्पा पूर्ण करुन, नोकरीची वाट पाहत असणाऱ्या स्वप्निल लोणकरने आत्महत्येचे पाऊल उचलले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या या आत्महत्येमुळे स्वप्निलच्या मनातील भावना सांगत हंबरडा फोडला.
“माझा तळतळाट आहे. एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या करावी. त्याच्याशिवाय सरकारला कळणार नाही, की आत्महत्या काय असते. मुलाच्या जाण्याचं दु:ख काय असतं. त्यांना नाही कळणार. त्यांची नुसती भांडणं. पण जगात काय चाललंय याच त्यांना काही देणंघेणं नाही. त्यांचं फक्त राजकारण चाललंय’, असे देखील त्या म्हणाल्या.
“आई, मी पास झालो; पण इंटरव्ह्यू झाला नाही’
“मला माहिती आहे की माझं पोरगं किती झुरायचं. आई, “माझा इंटरव्ह्यू झाला नाही. मी पास झालो पण इंटरव्ह्यू नाही झाला. दोन वर्षे माझा किती झुरला, हे मला माहिती आहे. तो माझ्याशी बोलायचा. मंत्र्यांना काही देणंघेणं नाही. त्यांची मुलं सुरक्षित आहेत. गरिबांची काय कितीही मेली, तरी त्यांना काही देणंघेणं नाही, असे सांगत स्वप्निलच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला.