नवी दिल्ली – पोलंडचे भारतातील राजदूत ॲडम बुराकोव्स्की यांचा भारतातील कार्यकाळ पूर्ण झाला असून ते भारताविषयी बोलत असताना भावूक झाल्याचे दिसून आले. ”नवी दिल्लीमध्ये घालवलेला वेळ आयुष्यभर लक्षात राहील आणि पुन्हा भारताला भेटण्याची मला आशा आहे.माझे भारताशी 26 वर्षांचे नाते आहे. मी 1997 मध्ये पहिल्यांदा भारतात पर्यटक म्हणून आलो. त्यामुळे माझे या देशावर पहिल्यापासून प्रेम आहे’ असे ते म्हणाले. ॲडम हे आता दक्षिणआफ्रिकेत आपल्या नवीन कार्यकळाची सुरवात करणार आहेत.
माध्यमांशी बोलताना ॲडम म्हणाले ”येथे कुटुंबासोबत घालवलेला वेळ मी लक्षात ठेवेल आणि त्याची कदर करेल. मी माझ्या कार्यकाळात भारत आणि पोलंड या दोन्ही देशातील संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
ॲडम म्हणाले, “भारत आणि पोलंड या दोन्ही देशांनी खूप कठीण काळातून प्रवास केला आहे.कोविड महामारीदरम्यान,या दोन्ही देशांनी एकजुट करत जागतिक समस्यांशी लढण्यासाठी आम्ही एकत्र कसे काम करू शकतो हे दाखवले. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यातील संकटानंतर पोलंडने युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास मदत केलेल्या ऑपरेशन ‘गंगा’ वरही त्यांनी भाष्य केले.
भारताच्या G20 अध्यक्षपदाबद्दल बोलताना ॲडम म्हणाले, भारत आणि G20 अध्यक्षपद केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठीही खूप महत्त्वाचे आहे. आज जग अनेक समस्यांना तोंड देत आहे. G20 एक मंच आहे जो या समस्येचा सामना करतो आणि सध्या भारताची यात मोठी भूमिका आहे.